लॉकडाऊन निर्णयात अंशतः बदल; लॉकडाऊनबाबत पुनर्विचार करा- आ.नमिता मुंदडा.

बीड दि.25 मार्च- वाढती महागाई, बाजार पेठेतील आर्थिक मंदी यामुळे अगोदरच सामान्य नागरीक आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन करणे सामान्य माणसांना परवडणारे नाही. शासनाने कडक निर्बंध घालून नागरिकांना शिस्त लावावी. लॉकडाऊन हा पर्याय ठरू शकत नाही. सामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी रोखण्यासाठी लॉकडाऊन बाबत पुनर्विचार करता येतो का? याबाबत निर्णय घ्यावा. अशी मागणी आ.नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून आज लॉकडाऊन मध्ये अंशतः बदल जाहिर करण्यात आला आहे.
(Partial change in lockdown decision; Rethink Lockdown – MLA Namita Mundada.)
बीड (Beed) जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासुन लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हे लॉकडाऊन सामान्य माणसांना व नागरिकांना परवडणारे नाही. गेल्या अनेक दिवसांपासुन कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यावर शासनाच्या वतीने उपचार व प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत. ते मोठ्या प्रमाणात वाढवून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मात्र लॉकडाऊनच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरू नये. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच बाजार पेठेत आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. ती अर्थव्यवस्था अद्यापही सुरळीत झाली नसताना पुन्हा दुसरा लॉकडाऊन सामान्य नागरिकांची गोची ठरणारा होवू लागला आहे.
अनेकांचे उदरनिर्वाह दैनंदिन रोजंदारीवर आहेत. शेतकर्यांचा भाजीपाला दररोज बाजारात येतो. दुकानावर हॉटेल, टपर्या इथे काम करणारे मजुर दररोजच्या रोजंदारीवर असतात. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न भेडसावणारा आहे. अॅटो रिक्षाचालक, छोटे वाहन चालक यांचे व्यवसाय अगोदरच चालत नाहीत. व्यवसाय मंदावल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. या मार्चंएन्ड मध्ये हे हप्ते भरावे लागणार आहेत. अशी स्थिती राहिली तर त्यांचे बँकेचे कर्ज पुन्हा वाढत जाईल. बारा बलुतेदार,फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते,व रस्त्यावरील विविध वस्तुंची विक्री करणारे विक्रेते यांचे व्यवसाय अडचणीत येतील. केज मतदार संघात केज, नेकनुर परिसरातून दररोज खवा मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई या ठिकाणी जातो.
जिल्हा बंदीमुळे हा व्यवसाय बंद पडेल. लॉकडाऊनमुळे दैनंदिन दुग्ध व्यवसायही संकटात सापडणार आहे. हॉटेल, व्यवसाय बंद राहिल्याने व बंदच्या काळात वाहतुक बंद राहिल्याने दुध संघही दुध घेत नाहीत. अशा स्थितीत दुध फेकुन देण्याची वेळ शेतकर्यांवर येते. मात्र महाग कडबा, महागडी पेंढ, विकत घेवून शेतकर्यांना दुधाचा व्यवसाय जोपासावा लागतो. तोही तोट्यात येत आहे. अशा स्थितीत शासनाने नागरिकांना मास्कचा सक्तीने वापर, सामाजिक आंतराची शिस्त लावावी. या बाबत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जनतेवर वचक ठेवावा. व्यापारी व नागरिक यांना मास्क व सॅनिटायझर च्या वापराची सक्ती करावी. जे नागरिक सर्दी, खोकला व कोरोनांच्या लक्षणांनी बाधित असतील त्यांना रुग्णालयात पाठवावे. व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट सुरू ठेवाव्यात. बाजारपेठेत कडक शिस्त लावावी. मात्र लॉकडाऊन हा पर्याय वापरू नये या बाबत पुनर्विचार करावा अशी मागणी आ.नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी केली आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात दि.26 मार्च ते 4 एप्रिल असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन (lockdown) जाहिर करण्यात आला. या लॉकडाऊनला विविध राजकीय पक्ष, संघटना व व्यापाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे. व्यापाऱ्यांनी तर सर्रास लॉकडाऊनला (lockdown) विरोध असल्याचे जाहिर केले. यासोबतच एआयएमआयएम या पक्षाकडूनही उघड विरोध दर्शवण्यात आला आहे. वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी बीड, अंबाजोगाई येथे लॉकडाऊनला विरोध दाखवत आंदोलन छेडले. वाढत्या विरोधामुळे जिल्हा प्रशासन भुमिका बदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रेस नोटच्या माध्यमातून आज लॉकडाऊन मध्ये अंशतः बदल जाहिर करण्यात आला आहे. यात विविध शालेय, महाविद्यालयीन, व्यवसायिक किंवा इतर सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परिक्षेस नियुक्त अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थीना परिक्षेस व प्रवेशास मुभा देण्यात आली आहे, यावेळी सोबत प्रवेशपत्र किंवा ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहिल. सर्व औषधालय 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी, शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरला सवलत देण्यात येत आहे तसेच स्थानिक स्वराज संस्थेची सर्व कार्यालय शासनाच्या नियमानुसार सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार, सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल्स, जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकन ची दुकाने, पार्लर, सलून, सार्वजनिक ठिकाणी फिरणे हे संपुर्ण बंद राहणार आहे. इतर नियमात कसलाही बदल करण्यात आला नसल्याने लोकांची निराशा झाली आहे.