बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी; ऊसाचा फड पेटवून शेतकऱ्याची आत्महत्या.

बीड दि.11 मे – बीड जिल्ह्यात ऊस जात नाही या निराशेतून एका शेतकऱ्याने ऊसाच्या फडाला आग लावून देत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथे आज घडली आहे. अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नामुळे आता शेतकऱ्यास आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी नामदेव जाधव (वय 35) यांना दोन एकर शेती आहे. त्यांनी आपल्या शेतात 265 जातीचे ऊसाचे पिक घेतले आहे. या ऊसाच्या पिकासाठी लाखो रुपये खर्च करत त्याचे संगोपण केले. मात्र मे महिना उजाडून दोन आठवडे उलटत असताना अद्याप पिक कारखान्याला गेलेला नाही.
नामदेव जाधव हे सतत कारखान्याच्या संपर्कात होते. सतत चकरा मारुनही ऊस जात नसल्यामुळे जाधव हे निराशेत गेले होते. आज याच नैराश्यातून त्यांनी ऊसाच्या फडाला आग लावून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न भविष्यात चांगलाच पेटणार असल्याचे दिसत आहे.
( First victim of excess sugarcane in Beed district; Farmer commits suicide by burning sugarcane. )