बीड व लातूरही निसर्गाच्या घेऱ्यात
धारुरमध्ये वेगात वारे

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर) १२९ वर्षानंतर महाराष्ट्रात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका बीड व लातूर जिल्ह्यातही बसू शकतो असे तज्ञांचे मत असून धारुर परिसरातही वेगात वारे वाहत असल्याचे दिसुन येत आहे. प्रशासनाच्या वतीने लोकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
निसर्ग चक्रीवादळाने आज साडेबारा वाजता महाराष्ट्रात अलीबाग येथे धडक दिली. यावेळी साधारण ताशी ९० ते १०० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहून मोठे नुकसान झाले. सध्या मुंबईत निसर्ग वादळाने प्रवेश केला असून हाहाकार माजला आहे. मुंबईत अनेक भागात वादळामुळे रस्त्यावर झाडे उळमळून पडली आहे. अनेक ठिकाणी इमारती वरील निवारे उडाली आहेत. या मुळे महाराष्ट्रात किनारपट्टीवरील ७० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. एनडिआरएफ च्या २१ तुकड्या सज्ज आहेत. अशीच परिस्थिती गुजरात राज्याची असून तेथेही किनारपट्टी खाली करण्यात यृवून एनडिआरएफच्या तेरा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. १२९ वर्षात प्रथमच येवढे मोठे वादळ अरबी समुद्रात उठले आहे. शतकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून याकडे पाहिले जात आहे. या वादळाच्या घेऱ्यात उर्वरित महाराष्ट्रही येत असुन बीड व लातूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील बसवकल्याण पर्यंत याचा प्रभाव असु शकतो. आज दुपार पासुनच धारुर परिसरात वेगाने वारे वाहत असल्याचे दिसुन आले. यामुळे याभागातही वेगवान वाऱ्यामुळे झाडे पडणे, तारा तुटणे, पत्रे उडणे आदी प्रकार घडू शकतात. किंचित पाऊसही होवू शकतो. लोकांनी घरात रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.