मोठी बातमी … राज्यातील निर्बंध 1 मे नंतरही चालू ठेवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत;

जालना दि.18 एप्रिल – कोरोनाचा संसर्ग (Corona infection) रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. हे निर्बंध 1 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंल लागू राहणार आहेत. मात्र राज्यातील हे निर्बंध परिस्थितीनूसार 1 मेनंतरही वाढवण्यात येऊ शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत.
(Big news … Health Minister’s signal to continue state restrictions after May 1;)
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कोरोनाचा संसर्ग (Corona infection) रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. आम्ही अजूनही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. काही ठिकाणी कोविड-19 च्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सीआरपीसीच्या कलम 144 च्या उल्लंघनाचे प्रकार दिसून आले आहेत. राज्यात कोरोनामुळे ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे ते पाहता राज्यात लावण्यात आलेले निर्बंध मे महिन्यापर्यंत पुढे वाढवण्यात येऊ शकतात. मात्र ही बाब कोरोनाच्या स्थितीवर अवलंबून असेल. अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले.
राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी 15 दिवसांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांनंतर राज्यात जे परिणाम समोर येतील, त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल. राज्यातील लोक या निर्बंधांना सहकार्य करत आहेत, असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी 14 एप्रिल रोजी ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) अंतर्गत राज्यात विविध निर्बंधांची घोषणा केली होती.
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या फैलावाचा वेग कायम आहे. राज्यात शनिवारी कोरोनाच्या 67 हजार 123 नव्या रुग्णांचे निदान झाले होते. तर दिवसभरात 419 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 37 लाख 70 हजार 707 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 59 हजार 970 जणांचा मृत्यू झाला आहे.
टोपे पुढे म्हणाले की, मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक अडचणी येणार असल्या तरी जनतेचा जीव वाचविण्यास प्राधान्य देऊन ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) चे निर्बंध घालावे लागले आहेत. कोरोनाची साठ हजार रुग्णांपर्यंत दररोज पोहोचणारी संख्या कमी व्हावी यासाठी जनतेने निर्बंधाच्या काळात सरकारला सहकार्य करून संक्रमण आणि संसर्ग टाळावा, अशी विनंती केली आहे.
सध्याच्या निर्बंधाचे 15 दिवस एकदा संपू द्या. मग त्या वेळी काय परिस्थिती राहील ते पाहून निर्बंधांचा कालावधी वाढवायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल. केंद्राच्या मदतीमुळे राज्यास प्राणवायूचा पुरवठा सुरू झाला आहे. आज शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासमवेत देशातील राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली. महाराष्ट्राने केंद्राकडे दोन हजार टन प्राणवायूचा पुरवठ्याची मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत दररोज पाचशे टन तरी प्राणवायूची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा आहे.
छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यांतून प्राणवायूचा पुरवठा सुरू होत असून रेल्वेच्या माध्यमातून तो राज्यात आणण्याचा विचार आहे. कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्याचा औद्योगिक जगताच्या मागणीचा राज्य सरकारने विचार केला आहे. हवेतून प्राणवायू घेण्याचा प्रयोग राबविण्याच्या संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असल्याचेही टोपे यांनी या वेळी सांगितले.