मोठी बातमी …. आता घरबसल्या करता येणार वारसा नोंद; महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय.

पुणे दि.23 मे – सातबारा उतारा, फेरफार आणि खाते उताऱ्यापाठोपाठ आता घरबसल्या वारस नोंद आणि तक्रार अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासाठीची सुविधा महसूल विभागाकडून (Revenue Department) ऑनलाईन (Online) उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या सोमवार दि.24 मेपासून राज्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सर्वसामान्याच्या दृष्टीने सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा व मोठा निर्णय मानला जात आहे.
(Big news …. now you can do it at home; Important decision of the revenue department.)
वारस नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अज्ञान पालक कर्ता (अपाक), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी अर्ज करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली (E-rights system) विकसित करण्यात आली आहे.
महाभूमी या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
महसूल विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाइन (Online) उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे.
कोरोनाच्या काळात ऑनलाइन सुविधेचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये, यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला आहे. आता याच्या पुढील पाऊल म्हणजे कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, अशी सरकारची भूमिका आहे. त्यानुसार सरकारने वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदीसाठी ई हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
अशी होणार प्रक्रिया
मयत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी या संकेतस्थळावर अथवा pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिंग करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील.
शेतकऱ्यांचा त्रास होणार कमी
अनेक शेतकरी शेतीपीक अथवा उद्योग व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनींवर बोजा चढविणे अथवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बँका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो. तो आता कमी होणार आहे. ‘इ-हक्क’ ही प्रणाली देखील बँकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बँकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे.
नागरीकांना होणार हे फायदे
– हस्तलिखित वारस नोंदवही आणि तक्रार नोंद वही बंद होणार
– या कामासाठी तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करता येणार.
– फक्त जबाब देण्यासाठीच तलाठी कार्यालयात जावे लागणार
– ऑनलाइनमुळे तलाठी स्तरावर पेंडन्सी कळणार
– आवश्यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसांत वारस नोंद
– त्यापुढील पंधरा दिवसांत फेरफार नोंद होणार
वारसनोंद, तक्रार अर्ज यासाठी ई हक्क प्रणाली (E-rights system) ही सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या कामांसाठी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महसूल विभागाकडून (Revenue Department) येत्या सोमवारपासून राज्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी केले आहे.