महाराष्ट्रातही बर्ड फ्ल्यूचे सावट…. बीड जिल्ह्यात कावळ्यांचा मृत्यू

बीडः दि.१०- देशातील सात राज्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातही याचा धोका वाढल्याचे दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अज्ञात रोगाने पक्षी मृत पावत असल्याचे आढळून येत आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा (Patoda) तालुक्यात काल २६ कावळे मृतावस्थेत आढळल्याने बर्ड फ्ल्यूची (Bird flu) भिती व्यक्त केली जात आहे.
भारतातील केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात व दिल्ली या सात राज्यात बर्ड फ्ल्यू चा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रातही हा धोका वाढल्याचे दिसत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, परभणी, दापोली नंतर आता बीड (Beed) जिल्ह्यात अज्ञात रोगाने पक्षी मरत असल्याचे दिसत आहे. पाटोदा (Patoda) तालुक्यातील मुगगाव येथे २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. मुगगाव येथे दोन दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले. अनेक कावळे मृत्युमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांना माहिती दिली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत अवशेष ताब्यात घेतले. आता सदरील अवशेषाचा अहवालावरुन हा प्रकार काय आहे ते उघड होणार आहे. सध्या मात्र अशा प्रकारामुळे पुन्हा बर्ड फ्ल्यूचे (Bird flu) सावट आल्याने भिती व्यक्त होत आहे.