सावधान… राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा अंदाज.

जालना दि.10 जानेवारी – तिसऱ्या लाटेला (Third wave) आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही,पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केला आहे.
(Caution … the third wave begins in the state; Health Minister Rajesh Tope’s prediction.)
आज राजेश टोपे हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, “राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचं आहे.
पुढे बोलताना, आज आपण बघतो आहोत की काल 45 हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? जसं दुसऱ्या लाटेत दररोज 65 हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता.
तसं या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असं वाटतं. त्यानंतर तो खाली जाईल असंही तज्ज्ञांचं मत आहे”.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असं आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील असं म्हटलं आहे.
राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम (Corona guidelines) आणि निर्बंधांचं (restrictions) पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावेत आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावेत असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.