सावधान… पुन्हा बिबट्याची दहशत….जनतेने खबरदारी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे विशेष प्रयत्न
बीडः दि.३० (प्रतिनिधी)- आष्टी तालुक्यातील सावरगाव परिसरात बिबट्याची दहशत माजली असुन वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला आहे. परिसरातील जनतेने घाबरून न जाता खबरदारी घ्यावी व बिबट्या आढळल्यास पोलीस व वनविभागाला संपर्क करावा असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे सुमारे दहा वर्षांपूर्वी धारुर वनपरिक्षेत्रात पसरलेल्या बिबट्याच्या दहशतीची आठवण होत आहे.
बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहानग्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यामुळे या घटनेमुळे खळबळ उडाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. दि.२७ तारखेपासुन ६ कर्मचारी संध्याकाळी ५ वाजेपासून ते सकाळी ८ पर्यंत मायंबा सावरगांव, शेंडगेवाडी पर्यंत गस्त घालत आहेत. दोन दिवसापूर्वी केलवंडी येथे आजोबांच्या कुशीत झोपलेल्या चिमुरड्याला बिबट्याने उचलून नेले होते. दादेगाव, शिरापूर, मेहकरी, श्रृंगेरीदेवी या परिसरातील नागरिकांनी बिबट्याचे दर्शन घडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आष्टी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असून विशेष प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये खबरदारी घ्यावी, असे आवाहन आष्टीचे वनाधिकारी शाम सिरसाट यांनी केले आहे. बुधवारी आष्टी वन विभाग व तिसगाव ता. पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगांव याठिकाणी पिंजरा बसवण्यात आला आहे. दहा वर्षापूर्वी धारुर तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून आला होता. जवळच्याच गांवदरा येथे शेतात लावलेल्या विद्यूत तारांच्या स्पर्शामुळे एक बिबट्या मृत आढळून आला होता. तर यानंतरही अनेक दिवस बिबट्याच्या दहशतीखाली लोक होते.