जमिनिच्या वादातून वृध्दाचा खून
धारुर तालुक्यातील हिंगणी खूर्द येथील घटना

किल्लेधारूर दि.२३ (वार्ताहर) शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबात वाद होवून ज्ञानोबा ग्यानबा सोळंके (वय ६५, रा. हिंगणी खु., ता. धारूर) यांचा खून झाला. मंगळवारी ६५ वर्षीय वृद्धाला दगड, विटांनी बेदम मारहाण झाली होती. ही घटना धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे घडली होती. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या वृद्धाचा गुरुवारी सकाळी ६ वाजता अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शेतातून घरी येत असताना ज्ञानोबा ग्यानबा सोळंके (वय ६५, रा. हिंगणी खु., ता. धारूर) यांना घराजवळ भाऊ मधुकर ग्यानबा सोळंके, शामल मधुकर सोळंके, सिद्धेश्वर मधुकर सोळंके आणि दयानंद मधुकर सोळंके यांनी अडविले. जमिनीच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. यावेळी शामल सोळंके हिने यांनीच आपली जमीन हडपली यांना मारा असे म्हणाली. त्यानंतर सिद्धेश्वर, दयानंद आणि मधुकर यांनी ज्ञानोबा सोळंके यांना दगड, विटांनी बेदम मारहाण केली. भांडणाची माहिती मिळाल्यानंतर ज्ञानोबा यांच्या मुलाने आणि इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत ज्ञानोबा यांची सुटका केली आणि त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान ज्ञानोबा सोळंके यांचा गुरुवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक व्ही.जे. शिंदे आणि पो.ना. सोनवणे, सरवदे यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रवी अरुण सोळंके यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींवर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक गव्हाणकर हे करत आहेत.