बीड जिल्ह्यात हॉटेल, पानटपरी चालकांना दिलासा; व्यापाऱ्यांसह एमआयएमच्या मागणीची दखल

बीड दि.17 मार्च – बीडचे (Beed) जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी दि.16 मंगळवार रोजी नवीन आदेश काढत हॉटेल, पानटपरी सारख्या व्यवसायिकांना दिलासा दिला. सरसकट बंदच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. एआयएमआयचे (AIMIM) जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफीक यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निर्बंध (restrictions) शिथिल करण्याची मागणी केली होती.
(Consolation to hotel, Pantpari drivers in Beed district; Notice MIM’s demand with traders)
जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि.13 मार्च पासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पान टपरी बंदचा निर्णय घेतला होता. यामुळे लहान व्यवसायिकांचे कंबरडे मोडणार असल्याने गोरगरीब व्यापाऱ्यांतून मोठा विरोध होता. याबाबत व्यापाऱ्यांसह एआयएमआयएमने (AIMIM) जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांची भेट घेवून शिथिलता देण्याची मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री नवीन आदेश काढले.
असे असतील नवीन आदेश
विनामास्क परवानगी देण्यात येऊ नये, शरीराचे तापमान तपासून प्रवेश देणे बंधनकारक राहील. पुरेशा प्रमाणात सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. संबंधित आस्थापनेने सामाजिक अंतर पाळणे व मास्क वापरणे हे पाहण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे, याची खात्री करावी.
सिनेमागृह, रेस्टॉरंट, सर्व शॉपिंग मॉल्सनादेखील हे निर्बंध (restrictions) पाळावे लागणार आहेत. मंगल कार्यालये, फंक्शन हॉल यांना लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे, तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.
गृहविलगीकरणास परवानगी
कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांच्या गृहविलगीकरणास निर्बंध पाळून परवानगी देण्यात आली आहे. गृहविलगीकरणाच्या ठिकाणी निदर्शनास येईल, अशा ठिकाणी 14 दिवसांसाठी कोविड बाधित (Corona Positive) रुग्ण असल्याचा फलक लावावा. आरोग्यविषयक व जीवनावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळता इतर सर्व कार्यालये 50 टक्के उपस्थितीत चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच धार्मिक संस्था व्यवस्थापनाने भाविकांच्या संख्येबाबत मर्यादा ठरवावी, तसेच ऑनलाइन आरक्षण सुविधा चालू करावी, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना (सर्व अत्यावश्यक किराणा, दूध विक्रेते, औषधालये वगळून) दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील.