मराठवाड्यात वाढतोय कोरोनाचा उद्रेक… पहा विविध जिल्ह्यांची परिस्थिती

औरंगाबाद: दि.२१(प्रतिनिधी) मराठवाड्यात कोरोना रुग्णांच्या संख्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. महिनाभरापुर्वी (२० जानेवारी) मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १७५ होती. मात्र आता ही संख्या ४३३ वर पोहोचली आहे. महिनाभरात परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णाची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे.
(Corona outbreak on the rise in Marathwada)
औरंगाबाद– औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे १४४ नवे रुग्ण आढळून आले, तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, ५७ जणांना सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८,४३७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४६,३९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२५१ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ७८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आहेत.
जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे ४ दिवसांत ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव सील करण्यात आले. शिवाय सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाची चार पथकेही तैनात करण्यात आली आहे. श्री क्षेत्र जाळीचा देव येथे चक्रधर स्वामींचे जागृत स्थान आहे. त्यामुळे याठिकाणी महाराष्ट्रासह परराज्यातून भक्त, अनुयायी दर्शनासाठी येतात. १५ दिवसांपूर्वी आश्रमातील एका महंतास कोरोनाची लागण झाली होती. धावडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तेथील अनुयायांच्या कोरोना चाचण्या केल्या त्यात २३ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गाव बंद करण्यात आले आहे.
बीड – बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा पडला आहे. जिल्ह्यात शनिवारी ५८ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अंबाजोगाईतील नागझरी परिसरातील एका ८५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यू कोरानामुळे झाला. तर १८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. नवीन आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक २५ रुग्ण बीड तालुक्यातील आहेत. त्यानंतर अंबाजोगाई १३, आष्टी ३, धारूर २, केज ४, माजलगाव ३, परळी ४, पाटोदा २ आणि शिरूर तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८,३६३ इतका झाला. यापैकी १७,५४४ जण कोरोनामुक्त झालेत, तर ५७३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
परभणी– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परभणी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले आहेत.
(Corona outbreak on the rise in Marathwada)