सावधान….आता सोशल मीडीयावर राहणार केंद्र सरकारचा वॉच…

नवी दिल्लीः दि.२५- दिवसेंदिवस सर्वसामान्य लोकांत व्हॉट्सअॅप, फेसबुक, युट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सोशल मीडियाचा होणारा वापर आणि गैरवापर या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणार चर्चा होत असते. या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह मजकूर व्हायरल होत असून अशा अनेक तक्रारी थेट न्यायालयापर्यंत पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने यासंदर्भातली नवीन नियमावली जारी केली आहे. देशात सेवा देणारे व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्वीटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांना ही नियमावली बंधनकारक केली जाणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे.

(Beware …. now the central government’s watch will be on social media …)

“सोशल मीडियाला भारतात व्यवसाय करण्याची पूर्ण मुभा आहे. त्यांचं स्वागत आहे. सोशल मीडियाच्या युजर्सच्या तक्रारी निवारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आक्षेपार्ह फोटो टाकले जात आहेत. देशाच्या नागरी व्यवस्थेला धक्का लावणाऱ्या बाबी घडत आहेत. सोशल मीडियाचा (Social Media) वापर दहशतवादी, देशविघातक शक्तींकडून केला जातो. मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज देखील चालवल्या जातात. आर्थिक घोटाळे केले जात आहेत”, असेही रवीशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.

सोशल मीडिया (Social Media) कंपन्यांसाठी अशी असेल नियमावली?

१) तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. तो तक्रार २४ तासांत नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचं निवारण करेल
२) जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल

३) भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसरची नियुक्ती करावी लागेल.
४) प्रत्येक महिन्याला तक्रारींचा अहवाल सादर करावा लागेल. महिन्याभरात किती तक्रारी आल्या आणि त्याच्यावर काय कारवाई केली याची माहिती द्यावी लागणार

५) आक्षेपार्ह मजकूर सर्वात आधी कुणी सोशल मीडियावर टाकला ते सांगावे लागेल. जर तो मजकूर भारताबाहेरून आला असेल, तर तो भारतात पहिल्यांदा कुणी टाकला, हे सांगावं लागणार
६) युजर्सचं व्हेरिफिकेशन कोणत्या मार्गाने केलं गेलं, त्याची माहिती द्यावी लागेल
७) जर एखाद्या युजरचा डेटा किंवा ट्वीट किंवा मजकूर हटवला गेला, तर त्या युजरला सांगावे लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल.

येत्या ३ महिन्यांत या नियमावली लागू केल्या जाणार आहेत. यामुळे सोशल मीडीयाचा विघातक व इतरांना त्रास देण्याच्या उद्देशाने होणाऱ्या वापरावर ब्रेक लागणार आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडीयाचा वापर गैरप्रकारासाठी होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!