फेसबुक लाईव्ह मधून शरद पवारांनी दिला हा इशारा; सहकार्य करण्याचे केले आवाहन.

मुंबई दि.8 एप्रिल- महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू (Corona virus) संक्रमणामुळे रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गरवर्षीच्या तुलनेत केवळ राज्यात नव्हे तर देशातही गंभीर आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामूहिकरित्या सामना करावा लागेल. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून केले आहे.
(This warning was given by Sharad Pawar from Facebook Live; Appeal to cooperate.)
आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. शरद पवार यांनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाचून दाखवत परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करुन दिली. महाराष्ट्रातील (Maharashtra) सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. कोरोनाचे हे संकट परतावून लावण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत.
मात्र, या निर्बंधांमुळे समाजातील कष्टकरी, व्यापारी, शेतकरी आणि इतर समाज घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना नाशिवंत मालाची विक्री कुठे करायची हा प्रश्न पडला आहे. एकूणच यामुळे सर्वांनाच झळ सोसावी लागत आहे. आपण या सगळ्यातून पुढे जात आहोत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात यश मिळवायचं असेल तर धैर्याने आणि सामूहिक पद्धतीने या संकटाला सामोरे गेले पाहिजे. एकजुटीने संकटाचा सामना करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कोरोनाचं संकट भीषण आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही. आपल्याला एकजुटीने लढण्याशिवाय पर्याय नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या (Maharashtra) पाठिशी असल्याचे आश्वासन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे शरद पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी व संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्व सूचनांचा विचार करून काही निर्णय घेतले जात आहेत. मात्र, हे निर्णय राबवण्यासाठी लोकांचं सहकार्य आवश्यक आहे. सगळ्यांनी कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले.