किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) Farmer suicide तालुक्यातील पहाडी पारगाव येथील तरुण गणेश भागवत रुद्रे वय ३८ वर्ष याने गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे शेतीच्या नापिकीमुळे रत्नसुंदर बँकेचे घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्याच्या चिंतेमुळे तसेच स्वतः च्या मुलांचे जात प्रमाणपत्र निघत नसल्यामुळे त्यांच्या भविष्याच्या काळजीमुळे दि.१९ जुलै रोजी शेतात कापूस फवारणीस आणलेले औषध प्यायले असता त्याचा लातूर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जमिनीतून म्हणावं तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यातच पहाडी पारगाव येथील तरुण गणेश भागवत रुद्रे (वय ३८) याने शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी आपल्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीवर रत्नसुंदर बँक माजलगावचे १० लक्ष रु कर्ज घेतले होते. परंतु गेल्या वर्षीच्या कमी पावसामुळे शेतामध्ये पीक म्हणावं तसे आलेच नाही, त्यामुळे बँकेचे हप्ते भरण्यास अडचण येत होती. बँकेचे कर्मचारी हप्ता भरण्यासाठी सतत तगादा लावत होते. परंतु जवळ काहीच पैसे नसल्यामुळे गणेशला पैसे भरण्याची सतत चिंता मनात लागली होती. तसेच आपल्या दोन मुली व एका मुलाचे शिक्षण चांगले व्हावे म्हणून जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसीलमार्फत माजलगावच्या उपविभागीय कार्यालयात कोळी महादेव जातींचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला होता. परंतु तेथील अधिकारी व कर्मचारी हे सतत चकरा मारून ही मुलांचे जात प्रमाणपत्र देत नव्हते, त्यामुळे त्याला आपल्या मुलांच्या भविष्यांची सतत काळजी वाटायची. “कर्जाचे हफ्ते कसे भरू? व मुलांचे शिक्षण कसे करू?” असे ते सतत म्हणत असायचे, यातच त्यांनी शेतात फवारणी साठी आणलेलं औषध पिले, असे त्याच्या पत्नीने सांगितले. त्याच्या पश्चात त्याची पत्नी छाया तसेंच धनश्री वय १२ वर्ष आणि समाधान व सुरती वय ७ वर्ष असे तीन मुले आहेत.