एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा; नांदेडात कर्मचाऱ्याचा मृत्यू, मृतदेह थेट बसस्थानकात.

मुंबई दि.3 डिसेंबर – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST employees strike) मागे न घेतल्यास अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) अंतर्गत कारवाई करावी लागेल, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज (दि.3) शुक्रवारी सांयकाळी 6 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान, नांदेड येथे एका संपकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून संपकरी व कुटूंबियांना मृतदेह थेट बसस्थानकात ठेवल्याची घटना घडली आहे.

(Warning of action under Mesma on ST employees; Death of an employee in Nanded, body directly at the bus stand.)

दरम्यान, एसटी (ST workers) कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीच (Dipawali) आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढ ही मागणी मान्य केली असून विलीनीकरणासाठी समिती नेमली आहे. तरीही कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून अद्यापही संप सुरुच आहे.

पुढे बोलताना परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 41 टक्के वाढ देण्यात आली असून विलीनीकरणाच्या प्रश्नासाठी समिती नेमण्यात आली आहे. शासन वेळोवेळी कर्मचाऱ्यांचा सहानूभुतिपुर्वक विचार करत आहे. मात्र काही जण कर्मचाऱ्यांत अफवा पसरवून दिशाभुल करत असल्याचे परब यांनी यावेळी म्हटलं आहे.

लाखो प्रवाशांना वेठीस धरुन काही एसटी कामगारांनी आपला संप सुरु ठेवला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून संप मागे न घेतल्यास मेस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) (Essential Services Act) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी या सर्व परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समोर ठेवून लवकरच कठोर पावलं उचलणार असल्याचे सांगितले.

नांदेड येथील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू … मृतदेह बस स्थानकात
एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन सुरू असताना नांदेड (Nanded) येथील एका एसटी कर्मचाऱ्याला भोवळ आल्याने तो आंदोलनस्थळी पडला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा आज मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी मृतदेह बस स्थानकात आणून ठेवला.

50 वर्षीय दिलीप वीर हे नांदेड आगारात वाहक पदावर कार्यरत होते. नांदेडमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. काल दिलीप वीर यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. पण ते हजर झाले नाही. आपल्याला देखील आता निलंबित केले जाईल या तणावात ते होते. कुटुंबातील लोकांना देखील त्यांनी याबाबत सांगितले होते. गेल्या अनेक दिवसापासून ते तणावात होते.

त्यांना दोन मुलं दोन मुली आहेत. मागील दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने आर्थिक परिस्थिती देखील गंभीर बनली होती. दरम्यान काल ते बस स्थानकात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी ते आले. सायंकाळी अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. आंदोलनस्थळावरून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सूरु असतांना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!