कार विहिरीत पडून पाच ठार… बीडच्या दोघांचा समावेश

बीडः दि.१३(प्रतिनिधी) रात्री ८ च्या सुमारास जालन्याजवळ कार वरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत कार कोसळल्याने पाच जनांना जलसमाधी मिळाली असून यात बीडच्या दोन तरुणांचा समावेश आहे. बीड येथील तरुण उद्योजकाचा यात सहभाग असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीडचे तरुण उद्योजक अब्दुल मन्नान शेख सगीर हे आपले मित्र अजहर कुरेशी यांच्या सोबत जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमा निमित्त इर्टिका गाडी नं. एम.एच. २२- ए.एम.२७०१ या गाडीने गेले होते. परत येत असताना जालना येथून सोबत आणखी तीन मित्रांना घेवून ते बीडकडे निघाले. मात्र जालन्याहून केवळ तीन कि.मी. बाहेर जामवाडी जवळ युवराज धाब्यासमोर कार वरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरात कार पडली. विहिर काठोकाठ पाण्याने भरलेली असल्याने दोन तास गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. या अपघातात पाच जन दगावल्याची माहिती असून इतर तिघांची ओळख पटलेली नाही. बीड येथील दोन तरुणांचा यात समावेश असून शहरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.