अंबाजोगाई दि 5 एप्रिल – अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील घाटनांदूर येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना चिरडल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात (Accident) तीघांचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी आहे. सदर अपघाताचे सीसीटीवी फुटेज वायरल झाले असून यात अपघाताची भीषणता दिसुन येते.
रस्त्याच्या कडेला पान टपरी समोर बोलत उभे असलेल्या चौघांना अंबाजोगाईच्या दिशेने आलेल्या भरधाव कारने चिरडल्याची घटना घाटनांदुर येथे सोमवारी (दि.4) रात्री 9 वाजून 50 मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. यामध्ये दोघे जागीच ठार तर एकाचा लातूर (Latur) येथे घेऊन जाताना रस्त्यात मृत्यू झाला. एक जण गंभीर असून कार मधील दोघे जखमी आहेत.
वैभव सतीश गीरी (वय 17) लहू बबन काटुळे (वय 30) असे जागीच ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. रमेश विठ्ठल फुलारी (वय 47) या जखमीचा लातूर येथे घेऊन जाताना रस्त्यातच मृत्यू झाला. या अपघातात उध्दव निवृत्ती दोडतले हे गंभीर जखमी आहेत. कारमधील दोघेही जखमी असल्याचे कळते.
मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका टपरी समोर चौघे उभे होते. यावेळी अंबाजोगाईच्या दिशेने कार (क्रमांक एम.एच.24 व्ही 2518) भरधाव वेगाने आली. चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती सरळ या चौघांवर येऊन धडकून फरफटत नेले. पुढे विद्युत खांबाला धडकून कार थांबली.
अपघात घडताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु वैभव गिरी व लहू काटुळे हे जागीच ठार झाले होते. तर रमेश फुलारी आणि उध्दव दोडतले हे गंभीर जखमी होते. या दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. लातूर येथे जाताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
या भीषण अपघातात तिघांचा बळी गेला आहे. दोडतले हे गंभीर जखमी आहेत. तसेच कार मधील दोघे जखमी आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून यातून अपघाताची भीषणता लक्षात येते. कारचा वेगही इतका होता की, कार विद्युत खांबाला धडकल्याने तो खांब पुर्ण वाकला आहे.
( Four were crushed by a speeding car; Three killed, three injured in road mishap )