कोरोंना विशेष

15 जूनपर्यंत लॉकडाऊनसाठी अशी असेल नियमावली; पहा काय बंद काय सुरु.

मुंबई दि.31 मे – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या हवी तशी कमी न झाल्याने लॉकडाऊनचे (lockdown) निर्बंध (restrictions) 15 जूनपर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी रविवारी रात्री केली. मात्र, रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहू शकतील.

(The rules for lockdown will be as of June 15; See what started off.)

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्याचा निर्णय आता मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी घेऊ शकतील.
दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचे अधिकार सरकारने स्थानिक पातळीवर दिले आहेत.

रुग्णसंख्येनुसार दोन विभाग करण्यात आले आहेत. ‘अ’ श्रेणीत करोना चाचणीत 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी कोरोनाबाधितांचे (Corona Positive) प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटा 40 टक्यांपेक्षा कमी भरलेल्या असल्यास निर्बंध (restrictions) शिथिल केले जातील. अशी शहरे आणि जिल्ह्यामध्ये दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहतील. अन्य दुकाने उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला जाईल. मात्र एकल दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाईल. मॉल्स किंवा व्यापारी संकुले उघडण्यास परवानगी नसेल. अत्यावश्यक सेवेप्रमाणेच अन्य दुकानेही दुपारी 2 पर्यंतच उघडी ठेवता येतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील वगळता अन्य दुकाने शनिवारी आणि रविवारी दोन दिवस बंद राहतील.

चाचणीत कोरोनाबाधितांचे (Corona Positive) प्रमाण 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू असतील. अशा जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जातील. जेणेकरून या जिल्ह्यातून लोक बाहेर जाणार नाहीत वा अन्य जिल्ह्यातील नागरिक जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये येणार नाहीत. शेतीचा हंगाम असल्याने दुपारी 2 पर्यंत खते, बि-बियाणे, अवजारे आदींची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला वेळेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

धान्य, डाळी, फळे, भाजीपाला आदींच्या पुरवठ्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही. दुकानांमध्ये कोणत्याही वेळी वस्तुंचा पुरवठा करू शकतात. फक्त मालाची साठवणूक करण्यासाठी दुपारी 2 नंतर दुकाने उघडे ठेवू शकतील. पण त्या काळात ग्राहकांना विक्री करता येणार नाही. तसे आढळल्यास कडक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. हॉटेलांना आताप्रमाणेच घरपोच सेवेस परवानगी आहे. हॉटेलांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. हे नियम 15 जूनच्या सकाळी सातपर्यंत लागू राहतील.

कोणत्या दुकानांना परवानगी मिळणार ?
केशकर्तनालये, संगणक, पावसाळी वस्तू , कपडे आदी दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार का, याची नागरिकांना अधिक उत्सुकता आहे. कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरे किंवा जिल्ह्यामध्ये स्थानिक प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते. कोणती आणि कशा पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी द्यायची याचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल.

मुंबई , ठाण्यासह दहा शहरांना अधिक सवलती ?
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांची स्वंतत्र प्रशासकीय घटक म्हणून गणना केली जाईल. या शहरांव्यतिरिक्त जिल्ह्य़ाच्या अन्य भागासाठी स्वतंत्र घटक असेल. मोठय़ा शहरांमध्ये अधिक निर्बंध शिथिल करता यावेत या दृष्टीनेच हे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रेल्वेसेवेवरील निर्बंध कायम : मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवेचा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वापर करता येईल. सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. संपूर्ण जून महिना रेल्वेसेवेचा सामान्यांना वापर करता येणार नाही, असे संकेत आहेत.

ई – कॉमर्स : सर्व वस्तूंच्या वितरणास परवानगी : कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये ई-कॉमर्सच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेबरोबरच अन्य वस्तूंच्या वितरणाला परवानगी देण्यात आली आहे.

खासगी कार्यालये बंदच :
सरकारी कार्यालयांमध्ये 25 टक्के उपस्थितीस परवानगी असेल. खासगी कार्यालये किंवा आस्थापने बंदच राहतील. याबाबत आधीच्या आदेशात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

थोडक्यात ….
आत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार.
राज्यातील जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आलीय
29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर (Positivity rate) 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक द चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.

सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील.

सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.

अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर (Positivity rate) 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक दि चेन (Break the chain) आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 चे ब्रेक दि चेनचे (Break the chain) निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!