BEED24

टोलनाक्यावर धरणे….आधी मावेजा द्या, नंतरच टोलवसुली करा….

अंबाजोगाई: दि.११(प्रतिनिधी) रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.११) सेलूअंबा येथील टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. आधी मावेजा द्या, नंतरच टोलवसुली (Toll) करा अशी मागणी यावेळी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.‌ माधव जाधव यांनी केली.

रेणापूर ते लोखंडी सावरगाव या ५४८-ब क्रमांकाच्या महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. परंतु, वाघाळा येथील ३५, सेलू आंबाच्या ११ आणि अंबाजोगाई (Ambajogai) ग्रामीण मधील १३ असे एकूण ६९ शेतकऱ्यांना तीन वर्षे उलटूनही अद्याप मावेजा मिळालेला नाही. अंबासाखर कारखान्यालाही मावेजा दिला मात्र गरजवंत शेतकऱ्यांचा मावेजा देताना मात्र कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु आहे. मावेजाची जवळपास ४५ कोटींची रक्कम प्रलंबित असताना आणि उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असतानाही टोलवसुली (Toll) मात्र घाईने सुरु करण्यात आली. त्यामुळे मावेजा दिल्याशिवाय टोलवसुली करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.‌ माधव जाधव यांनी दिला होता. आज टोलनाक्यावर धरणे आंदोलन करण्यात आले.

Exit mobile version