बीड जिल्ह्यात एका दिवसात तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू ; शेत मशागतीप्रसंगी घडल्या घटना.

बीड दि.16 जुन – बीड (Beed) जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यातील केज, गेवराई आणि आष्टी तालुक्यात शेतकरी शेत मशागतीच्या कामात असताना या घटना घडल्या आहे.
गेली काही दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतीमधील मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करत आहेत. अशातच शेतीची कामे करताना बीड जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
केज तालुक्यात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
केज (Kaij) तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथील बाबूराव गणपतराव चंदनशिवे (वय,55) या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाबुराव चंदनशिवे हे सायंकाळच्या वेळी आपल्या शेतामध्ये विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा स्पर्श एका लोखंडी विद्युत पोलला झाला.त्यावेळी विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. बाबुराव चंदनशिवे यांच्या भावाच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गेवराई तालुक्यात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
गेवराई तालुक्यातल्या राजपिंपरी येथे संजय बरगे हे शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत असताना खाली लोंबकळलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. संजय बर्गे यांची एक व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी म्हणून गेवराई शहरात ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा त्यांचा परिवार आहे.
आष्टी तालुक्यात तलावात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
आष्टी (Ashti) तालुक्यातील शिरपूर येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शिरपूर येथील श्रीकृष्ण जगताप हे आपल्या शेतात असलेली विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटारीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यानंर ते शेततळ्यात उतरले. एका दोरखंडाला पकडून शेततळ्याच्या वर येत असताना अचानक दोरखंड तुटून ते पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
( Unfortunate death of three farmers in Beed district; Incidents on farm cultivation. )