कोरोंना विशेष

एकाच दिवसात महाराष्ट्रात आढळले ४ हजार ७८७ कोरोना बाधित तर ४० मृत्यू …. पहा राज्याचा आढावा

मुंबईः दि.१८ – राज्यात पुन्हा कोरोनाने उचल खाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून चिंतेचे वातावरण आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची (Corona Positive) संख्या दीड हजाराच्या आत आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार बुधवारी राज्यात ४ हजार ७८७ कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली असून ४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बुधवारी राज्यात ४० रुग्णांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यू दर २.५९ टक्के इतका आहे. तर आज दिवसभरात ३ हजार ५८३ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढीबरोबर मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

सध्या राज्यात ३८ हजार १३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५४ लाख ३५ हजार २६८ प्रयोगशाळा नमुन्यापैकी २० लाख ७६ हजार ९३ नमुने पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १३.४३ टक्के इतके आहे. सध्या १ लाख ९५ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

बुलढाणा– बुलढाणा जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक १९९ कोरोना पॉझिटिव्ह (Positive) रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी करत लॉकडाऊन (Lockdown) केला आहे. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात नवीन आदेशाने शाळा महाविद्यालय २८ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले असून शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभाला ५० ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

अकोलाः– अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी  १५ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. अकोला येथे शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अमरावती येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बीड/जालना:- राज्यात अनलाॅक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिकांसह प्रशासनाला कोरोनाचा विसर पडल्याने कोरोना (corona) प्रतिबंधक नियमांकडे सर्वांनी दूर्लक्ष केले. परिणामी कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागल्याने प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागत आहे. कोरोनाचा (corona) प्रसार रोखण्यासाठी बीड व जालना जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेसच्या तपासणीसाठी पथक तयार करुन कारवाईचा बडगा उभारला आहे.

नागपूर : नागपुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) तसेच शासकीय दंत महाविद्यालयीन रुग्णालयात चाळीसच्या वर निवासी डॉक्टर, एमबीबीएस विद्यार्थी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट असून केवळ नागपुरात नव्हेतर विदर्भात दिसून येत आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ येथे प्रशासनाने गर्दी आढळून आल्यास थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पुणे – पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ८५७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४२८ जण आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!