धारुर तालुक्यात ग्रामस्थांनी दिला रस्त्यावर ठिय्या ; 35 ते 40 जणांनी केले उपोषण.

किल्लेधारूर दि.24 सप्टेंबर – धारुर तालुक्यातील आरणवाडीत रस्त्यावरच ग्रामस्थांनी ठिय्या दिल्याची घटना शुक्रवारी दि.23 रोजी घडली. गावातील माळीवस्ती रस्त्याचे काम सुरु असून सदर काम अरुंद होत असल्याने रस्ता किमान 30 फुटाचा करावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कालपासून रस्त्यावर ग्रामस्थ आमरण उपोषण करत असून आज दि.24 शनिवारी वृत्त लिहेपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नव्हती.
( In Dharur taluka, the villagers stayed on road; 35 to 40 people went on fast. )
याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर (Dharur) तालुक्यातील आरणवाडी येथील सर्वे नंबर 6 व 7 च्या नंबर बांधावरून माळीवस्तीकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून (Chief Minister Gram Sadak Yojana) करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ आठ फुटाचा रस्ता काढून दिला जात आहे. यामुळे सदर रस्ता होवूनही विद्यार्थी व ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होणार आहे. प्रशासनाकडे 30 फुटाचा रस्ता काढण्याची मागणी असतानाही अरूंद रस्ता काढत असल्याने या वस्तीतील ग्रामस्थांनी रस्त्यावरच आमरण उपोषण (Immortal fasting) सुरू केले असून हा प्रश्न मार्गी लावल्या शिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार या उपोषणकर्त्यानी घेतला आहे.
सदर रस्ता अरूंद असल्याने या भागातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता होत असल्याने नंबर बांधा वरून 30 फुट रस्ता काढण्याचे मागणी ग्रामस्थ करत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीवरुन मंडळ अधिकारी , तलाठी व पोलीस प्रशासना सदर रस्त्याची पाहणी केली. परंतू पाहाणीनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 8 फुटाचा रस्ता खुला करून दिला. वाहतूकीसाठी रस्ता किमान 30 फुट रुंदीचा आवश्यक आहे. सदर रस्ता 8 फुट ऐवजी 30 फुट रुंदीचा करुन ग्रामस्थ व विद्यार्थ्याची गैरसोय दुर करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू केले. हा सर्व रस्ता खुला केल्या शिवाय हे अंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार या वस्ती वरील रहिवाशांनी केला. या उपोषणात सरपंच लहू फुटाणे, मधुकर फुटाणे, प्रदीप फुटाणे, मैनाबाई फुटाणे, नवनाथ फुटाणे, सुरेश फुटाणे यांच्यासह 35 ते 40 ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.