पत्रकार संरक्षण कायदा बांधला खुंटीला; महाराष्ट्रातील पत्रकारांवरचे हल्ले पुन्हा वाढले
एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई दि.१८- महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा चिंताजनक वाढ झाल्याने माध्यम जगतात अस्वस्थतः आणि संतापाची भावना दिसते आहे. गेल्या महिनाभरात ९ पत्रकारांवर गुंड आणि पोलिसांकडून हल्ले झाले, ४ जणांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले, काही पत्रकारांना नोटिसा पाठविल्या गेल्या तर एका पत्रकाराला अटक केली गेली. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतानाही दर तीन दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे ही गोष्ट चिंताजनक असून पत्रकारांना निर्भयपणे काम करणे अशक्य झाल्याने मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे..
कोरोनाचं संकट आल्यानंतर सातत्यानं पत्रकारांवरील हल्ले अचानक वाढले आहेत. विशेषतः पोलिसांकडून पत्रकारांवर होणाऱ्या हल्लयाचं प्रमाण मोठे आहे. पुर्वीच्या कुठल्यातरी बातमीचा राग धरून पत्रकार रस्त्यावर दिसताच त्याला पोलिसांकडून बदडून काढले जात आहे. अनेक प्रकरणात पोलिसांनी पत्रकारांवरील हल्ल्यांच्या तक्रारी देखील घेतलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत तेथे जुजबी कलमं हल्लेखोरांवर लावली गेली आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास सर्वत्रच पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. पोलिसच हल्लेखोरांना अशा पध्दतीनं पाठिशी घालत असल्यानं बारा वर्षांच्या संघर्षानंतर पत्रकारांनी मिळविलेला पत्रकार संरक्षण कायदा वांझोटा ठरताना दिसत आहे. कोरोना संदर्भात बातम्या दिल्यामुळंही केज, नेवासा आणि अन्य काही ठिकाणी हल्ले झाले अाहेत. मात्र तेथेही पत्रकार संरक्षण कायद्याची कलमं लावली गेली नाहीत. त्यामुळे पत्रकारांना मारहाण करूनही हल्लेखोर उजळमाथ्यानं फिरताना दिसत आहेत. पत्रकारांवर हल्ले करून करण्यात येत असलेल्या मुस्कटदाबीचा, पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांचा, पत्रकारास झालेल्या अटकेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात निषेध करीत आहे. या विरोधात नेमकी काय भूमिका घ्यायची आणि कश्या पध्दतीनं हा विषय मार्गी लावायचा याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या आज झूमच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत घेतला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून सारा तपशील त्यांच्या कानी घालण्यात येणार असल्याचे एस.एम.देशमुख यावेळी यांनी स्पष्ट केले.