राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात मोदी… मोदीनी पवारांचे नेतृत्व स्विकारले.

मुंबई दि.21 अॉक्टोंबर – बीड काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) मुंबई कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), बीडचे आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोणवने यांची यावेळी उपस्थिती होती.
(Modi at NCP’s Mumbai office … Modi accepted Pawar’s leadership.)
कोण आहेत राजकिशोर मोदी?
राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राज्यभरात 17 शाखा आहेत. अंबाजोगाई नगर परिषद 30 वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे. गेल्या 30 वर्षापासून ते काँग्रेसचं काम करत होते. 14 वर्ष युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. तसेत 2013 ते 2014 या काळ ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. 2009 ते 2018 पर्यंत ते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ नागपूरचे उपाध्यक्ष होते.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसला (Congress) जबर धक्का दिला आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी (Rajkishor Modi) यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह गुरूवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. बीडचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महादेव धांडे, धारुरचे माजी तालुकाध्यक्ष अजयसिंह दिख्खत यांचाही प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांत समावेश आहे.
गेली अनेक वर्षे मोदी यांनी अंबाजोगाईत (Ambajogai) काँग्रेसचा गड भक्कमपणे सांभाळलेला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. मागील 30 ते 35 वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रीय असताना राजकिशोर मोदी यांनी एनएसयुआय (NSUI), जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, प्रदेश संघटनेसह विविध महामंडळे व समित्यांवर काम केले आहे. 20 वर्ष त्यांनी येथील नगर पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व राखले आहे. दोन वेळा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे आले होते. परंतु, संधी मिळाली नाही.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), दिवंगत माजी आ. बाबूराव आडसकर, विद्यमान मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. पक्षांतर्गत कुरघोड्यांमध्ये ते नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यातूनच त्यांनी आज राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.
अंबाजोगाईमध्ये मोदी यांनी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व मागील अनेक वर्षांपासून कायम ठेवले होते. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने काँग्रेसची ताकद आणखी कमी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात काँग्रेसला उतरती कळा लागली. मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नव्हता. काँग्रेसवर पहिल्यांदाच ही नामुष्की ओढवली होती. आता पक्षांतर्गत कुरघोडी फटका पक्षाला बसू लागला आहे.