पुन्हा त्याच विहिरीने घेतला मायलेकीचा बळी….. गावकऱ्यानी केला रास्ता रोको

जालनाः दि.१३- दोन दिवसांपूर्वी जालना शहरानजीकच्या जामवाडी येथील विहीरीत कार कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्याच विहिरीत आज रविवारी सकाळी ७ च्या सुमारास पुन्हा कार कोसळून झालेल्या अपघातात आईसह ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू आहेत. आरती फांदडे (३०) आणि त्यांची मुलगी माही फांदडे (४) अशी मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलीचे नाव आहे. दरम्यान येथील ग्रामस्थांनी तात्काळ या जीवघेण्या विहिरीजवळ असलेल्या रस्ता करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करत रास्तारोको आंदोलन केले.
जालना ते देऊळगावराजा मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज (रविवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार कोसळली. या अपघातात मायलेकीचा मृत्यू झाला आहे, तर तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या विहिरीत दोन दिवसांपूर्वी बीड येथील कार कोसळली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी हा दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात जखमी झालेल्या गोपाल फांदडे, वेदिका फांदडे आणि जय वानखेडे या तिघा जणांवर उपचार सुरू आहेत. फांदडे कुटुंब हे वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सिंगडोह गावातील रहिवासी असून ते शेगाव येथून औरंगाबादकडे जात असताना हा अपघात झाला. या प्रकरणी रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जामवाडी येथील ग्रामस्थांनी केली. रस्ता खराब असल्याने व कंत्राटदाराकडून दिशानिर्देश फलक न लावल्यामुळे रस्त्यावरील वाहनं थेट विहिरीत जाऊन कोसळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या घटनेला रस्त्याचा कंत्राटदार जबाबदार असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जामवाडी येथील गावकऱ्यांनी जालना-देऊळगावराजा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलना दरम्यान गावकऱ्यांनी घटनेत उशिरा मदतकार्य करणाऱ्या प्रशासन आणि रस्त्याच्या कंत्राटदराचा निषेध नोंदवला.