माझे भांडण नियतीशी- पंकजा मुंडे; राजीनामे नामंजूर.

मुंबई दि.13 जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात 77 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले.
(My quarrel with destiny- Pankaja Munde; Resignation denied.)
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य कार्यकर्ते इथे आले आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्यात आहेत. मार्गदर्शाची वाट पाहत आहेत. मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना न्याय देण्याचे काम केले. तळागाळातील माणूस हा ग्राम पंचायत सदस्य ते आमदार, खासदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. मुंडे साहेबांनी फक्त परळीची आमदारकी मिळवावी म्हणून राजकारणात आणले नाही. त्यांनी लढा दिलेल्या प्रस्थापितांविरोधात उभे करण्यासाठी मला राजकारणात आणले.
मुंडे साहेबांनी मुलीला मंत्री करा, संत्री करा, या नातेवाईकाला करा, असे कधी म्हटले नाही. वडील राजकारणात असताना मी राजकारणात आले. त्यांच्या चितेला अग्नी देताना अनेक लोक मला ढकलत होते. अनेकांनी मुंडण केले. घोषणा देऊ नका, मला त्यातून ताकद जरूर मिळते, परंतू आज ते स्थान नाही.
माझे भांडण नियतीशी आहे, मुंडे साहेबांना दिलेली सत्ता या नियतीने खेचून घेतली. ती सत्ता खेचून आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे मी म्हणाले होते. मुंडे साहेबांचे स्वप्न होते, भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा, ते स्वप्न पूर्ण करावे म्हणून मी संघर्ष यात्रा काढली होती. राज्यातल्या नेत्यांनी केंद्रात प्रस्ताव पाठवला होता. पंकजा मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद द्या, मी नाकारले, असे पंकजा म्हणाल्या. मग मी तुम्हाला राजीनामे द्यायला लावेन का, असा सवाल करत मी तुम्ही दिलेले राजीनामे नामंजूर करत आहे, अशी घोषणा पंकजा यांनी केली.