BEED24

नारायण राणे यांना जामीन मंजूर; मात्र आता…

महाड दि.25 अॉगस्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना अटक झाली होती. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर आता राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. तसेच नाशिक आणि पुणे पोलीस राणेंना ताब्यात घेणार नाहीत हे ही स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण असून अद्याप मात्र प्रकरण शांत झाले नसल्याचे चित्र आहे.
(Narayan Rane granted bail; But now …)

महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुमारे एक तास सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद जवळपास पाऊण तास चालला. त्यानंतर 15 मिनिटांनी न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांचा जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या एका विधानामुळे अनेक चुकीच्या घटना घडल्या आहेत. राणेंचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी नारायण राणे यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.

मात्र, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांची ही मागणी फेटाळून लावली. तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या वकिलांकडून राणे यांनी केलेले विधान हे सार्वजनिकरित्या केले होते. त्यामुळे त्यामागे कुठलाही कट नव्हता असे सांगितले. तसेच राजकीय हेतूने प्रेरित होऊन पोलिसांनी (Police) राणेंवर कलमे लावल्याचा गंभीर आरोपही राणेंच्या वकिलांनी यावेळी केला. तसेच राणेंच्या अटकेसाठी पोलिसांकडून कुठलेही अटक वॉरंट देण्यात आले नाही, असा युक्तीवादही करण्यात आला. राणेंच्या प्रकृतीचे कारण देत राणेंना जामीन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नारायण राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर आता भाजपच्या प्रमुख नेत्यांची प्रमुख बैठक होणार आहे. या बैठकीत राणेंवर झालेल्या कारवाईबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. तसेच पुढील रणनीती कशी असावी याबद्दल चर्चा केली जाणार आहे. सध्या कोकणात राणेंच्या जन आशीर्वाद यात्रा (Jan ashirwad Yatra) सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version