धारुरकरांसाठी आनंदवार्ता; बहुप्रतिक्षित पाणी पुरवठा योजनेला वेग, जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत आले पाणी.

किल्ले धारूर दि.26 मे – धारूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या आठ वर्षा पासून सुरू असलेल्या कुंडलिका धरणा वरून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर अरणवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पर्यंत आणण्यात नगर परिषदेला यश आले असून यामुळे या कामात मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून व जलपूजन करून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
धारूर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी धनेगाव योजना कालमर्यादा ओलांडल्यामुळे कुचकामी ठरत आहे. दहा ते पंधरा दिवस पाणी पुरवठा खोळंबत असल्यामुळे धारुरकरांचे हाल होत आहेत. शहराचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील कुंडलिका धरणावरून धारूर शहरासाठी 22 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आठ वर्षा पूर्वी आ. प्रकाशदादा सोळंके यांनी मंजूर केली. मात्र या योजनेचे काम अद्यापही संथ गतीने सुरू होते.
या योजनेचे काम हे आठ वर्षा पासून सुरू असल्याने एक वर्षापूर्वी या योजनेचे कंत्राटदार बदलण्यात आला. या योजनेचे पाणी यावे या साठी अनेकांनी पाठपुरावा केला. शहराचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी हे पाणी येणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन आ. प्रकाश दादा सोळंके यांनी ही या पाणी पुरवठा योजना तात्काळ व्हावी यासाठी दोन महिन्यापुर्वी नगर परिषद कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत संबंधित कंत्राटदाराला येत्या तीन महिन्यात काम पुर्ण करण्याची सुचना आ. सोळंके यांनी केली.
याबाबत सतत पाठपुरावा करुन नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी आ. सोळंके यांच्या सुचनांनूसार विशेष लक्ष दिले. जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पाणी येण्या साठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. अनेक ठिकाणी लीकेज असल्याने गेल्या महिन्या पासून पाईप लाईन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या योजनेचे पाणी अखेर गुरुवारी (दि.26) आरणवाडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पर्यंत आणण्यात यश मिळवले.
जलशुद्धीकरण प्रकल्प पर्यंत हे पाणी आल्यामुळे या ठिकाणी माजी नगरसेवक अर्जुनराव गायकवाड, राष्ट्रवादीचे युवानेते सुधीर शिनगारे, बालासाहेब चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन, हरिभाऊ मोरे खय्यूमभाई जरगर आदींच्या उपस्थितीमध्ये व संबंधित एजन्सीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. या योजनेचे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत आणण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रोजेक्ट मॕनेजर एन. के. राऊत, इलेक्ट्रीक विभागाचे राजू गादगी, चोरांबा येथील बालासाहेब चव्हाण यांचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या योजनेचे पाणी धारूर शहराची काही दिवसांत तहान भागवेल अशी आशा निर्माण झाली असून धारुरकरांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
( Good news for Dharurkar; The much awaited water supply scheme was speeded up, water came to the water purification project. )