आता मुंबई उच्च न्यायालयानेही दिला हा निर्णय…. प्रेम विवाह प्रकरण

मुंबई:- अलाहाबाद उच्च न्यायालयानंतर आता मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयानेही सज्ञान मुलगी तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते. तिच्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवित एका २३ वर्षीय मुलीचा तिच्या प्रियकराच्या घरी राहण्याचा व त्याच्याशी विवाह करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
एमबीएच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मुलाने त्याच्या प्रेयसीच्या पालकांविरोधात पोलिसांत तक्रार केली. पण त्यातून काहीही साध्य न झाल्याने त्याने मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयात (High court) हरवलेली व्यक्ती हजर करा यासाठी याचिका दाखल केली. याचिकेनुसार, मुलीच्या आई वडिलांनी दोघांचे धर्म वेगळे असल्याने या विवाहास (Marriage) आक्षेप घेतला होता. त्यांचे गेले पाच वर्षे एकमेकांवर प्रेम आहे आणि मुलीच्या घरी याची माहिती मिळताच त्यांनी मुलीला मारहाण केली व मुलाच्या घरच्यांना शिवीगाळ केली. पोलिसांनी जबरदस्तीने मुलीला त्याच्या घरातून नेले. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला एक महिना इतरत्र ठेवत फोनही काढून घेतला. उच्च न्यायालयात (High court) याचिका दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला न्यायालयात हजर केले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. न्यायालयाने याबाबत मुलीकडे विचारणा करताच तिने आपल्याला प्रियकराकडे राहायचे असून त्याच्याशी लग्न (Marriage) करायचे आहे व उर्वरित आयुष्य त्याच्याबरोबरच व्यतीत करायचे आहे, असे सांगितले. यावर न्यायालयाने ‘ती सज्ञान आहे आणि ती तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते. आम्ही किंवा तिचे पालक तिच्या या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार कुठेही जाऊ शकते, हा कायदा आहे,’ असे म्हटले.