आता कोरोना स्ट्रेनची दहशत…भारतासह या राष्ट्रांनी उचलले हे पावलं..

मुंबई: दि.२२- ब्रिटनमध्ये (UK) पसरलेल्या कोरोना (corona) विषाणूचा स्ट्रेन आता चांगलाच वाढला आहे. कोरोना स्ट्रेनच्या फैलावामुळं अनेक देश सावध झाले आहेत. ब्रिटनमध्ये तर सर्व बाजारपेठा बंद करण्याचे आदेश पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी दिले आहेत. याशिवाय सर्व ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. आधीच्या कोरोना (corona) विषाणूपेक्षा तब्बल ७० टक्के वेगानं या कोरोना स्ट्रेनचा प्रसार होत असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळं जगाची चिंता चांगलीच वाढली आहे. लंडनसह दक्षिणी इंग्लंडमध्ये या कोरोना स्ट्रेनचा फैलाव अतिशय वेगाना झाला आहे. ब्रिटनची (UK) सगळी आरोग्य व्यवस्था हा स्ट्रेन (Strain) थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.
फ्रान्स, कॅनडा, इटली, नेदरलँड, बेल्झियम, चिली, बुल्गेरिया, आर्यलँड, जर्मनी या देशांनी अत्यंत कडक पावलं उचलली आहेत आणि प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत. त्यापाठोपाठ सौदी अरबियातही कडक पावलं उचलतं सगळे आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आले. हा स्ट्रेन (Strain) कायम असेपर्यंत उड्डानांवर स्थगिती असेल असं सौदीच्या प्रशासनानं जाहिर केलं. सौदी अरब यावरच थांबला नाही, तर परदेशातून होणाऱ्या जलवाहतुकीवरही बंदी घातली आहे. याशिवाय मागील ३ महिन्यात युरोपातून परतलेल्या सर्वांची कोविड-१९ (covid-19) चाचणी करण्यासह त्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आलेत. असं असलं तरी मालवाहू विमान आणि जहाजांच्या वाहतुकीला यातून सूट देण्यात आली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी सर्व उड्डाण स्थगित केली आहेत. यामध्ये कॅनडासह नेदरलँड, बेल्झियम, ऑस्ट्रिया, आर्यलँड आणि बुल्गेरियाचा समावेश आहे. ब्रिटनमधील कोरोना स्ट्रेनचं गांभीर्य लक्षात घेत, भारत (India) सरकारनंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहे. २२ डिसेंबरपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत सर्व उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून पुढे स्थगिती कायम ठेवायची की उड्डाणं सुरु करायची हा निर्णय होणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. भारतातील सर्व विमानतळांवर ब्रिटनहून येणाऱ्या नागरिकांची कोविड-१९ (covid-19) ची RT-PCR टेस्ट केली जाणार आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. नागरिक उड्डयन मंत्रालयानं कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर हा नियम लागू केला आहे. २२ डिसेंबरपर्यंत किंवा त्याआधी भारतात (India) आलेल्या विमानांतील सर्व प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. शिवाय त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल. महाराष्ट्रात खबरदारी म्हणून नाताळ व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व महापालिका क्षेत्रात रात्रीच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.