नवरात्र निमित्त…नवसाला पावणारी अंबाचोंडी माता

(नैमित्तिक)
ऐतिहासीक किल्लेधारूर शहराची अनेक वैशिष्ट्ये सांगीतली जातात त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे धारूर शहराच्या पश्चिमेस डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी असनारे अंबाचोंडी मातेचे मंदिर. शहराची ग्रामदैवत म्हणुन ओळखली जाणारी आणि भक्ताच्या नवसाला पावणारी म्हणुन हि माता धारूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथील देवीला सप्तशृंगीदेवीचे उपपिठ म्हणून ओळखले जाते.
नवरात्रच्या निमित्ताने जिल्ह्यासह महाराष्ट्रातुन भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसुन येत असते. यंदा मात्र कोविड प्रादुर्भावाचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. निसर्गरम्य ठिकाणी खळखळणाऱ्या नदीकाठी भक्ताचे मन प्रसन्न करून जाते. बालाघाट पर्वत रांगाच्या पायथ्याशी धारूर शहरापासुन अवघ्या तीन किमी अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम अतीशय प्राचीन दगडात करण्यात आलेले आहे. मंदिराच्या चोही बाजुने उंच डोंगर असुन निसर्गाच्या सानिध्यांत हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार राजमाता आहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते. भक्तांच्या नवसाला पावणारी आणि ईच्छा पुर्ण करणारी देवी अंबाचोंडी माता संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परप्रांतातून हजारो भाविक मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. अंबाचोंडी मातेची मुर्ती अखंड पाषाणात कोरलेली असुन अतिशय आकर्षक व मनमोहक आहे. नाशिक जिल्ह्यातील संप्तश्रृंगी देवीचे हे उपपीठ म्हणुन हे मंदिर राज्यभर प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या पायथ्याशी दक्षिणे कडुन उत्तरे कडे बारमाही वाहणारी नदी असुन निसर्गाच्या सानिध्यांत हे मंदिर वसलेले आहे. ससे, हरिण, मोर यासह अन्य वन्यप्राणी या परिसरात मुक्त संचार करताना आढळतात. डोंगर दरीतून पक्षी प्राण्याचे येणारे मधूर आवाज भक्ताना प्रसन्न करतात. अनेक भाविक तर पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी या तिर्थक्षेञास आवर्जून भेट देतात.
लोकप्रतिनिधीच्या स्थानिक विकास निधी, लोकसहभाग व भाविकांच्या नवस पुर्तीतुन या ठिकाणी विकास कामे करण्यात आली आहेत. मंदिरासमोर सिमेंट बंधाऱ्याचे बाधंकाम झाल्यामुळे मंदिर व मंदिर परिसराच्या सौंर्दयात आणखीनच भर पडली आहे. या ठिकाणी मंदीरा पर्यंत डांबरीकरण झाले असून माजी केंद्रीय मंञी शहराचे भुमिपूञ जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी येथे सभागृहाचे बांधकाम खासदार निधीतुन केले असून भक्ताना हा निवारा झाला आहे. नदी च्या बाजूला पायऱ्या तटरक्षक भिंत माजी आ. भाई जनार्धन तुपे यांनी त्यांचे स्थानीक विकास निधी मधून केलेली आहे. येथे भक्तानी प्रवेशद्वार, पाण्याचे हौद, भक्ता साठी पञ्याचा निवारा फरशी अशी विविध कामे करण्यात आली आहेत. मंदिर परिसरात एक पुरातन दिपमाळ व काही समाधी व अग्निकूंड आहे. येथे एका भक्ताने मोठा घंटा अर्पण केली आहे. नवरात्र च्या निमीत्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या भक्तीभावाने डोगंराळ भागातुन वाट काढत दर्शनासाठी येत असतात. सकाळी पहाटे पासून राञी उशीरा पर्यंत भक्ताची दर्शना साठी रेलचेल सुरू असते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिराजवळ ठिकठिकाणी नवरात्र काळात चहापाण, खेळण्या व फराळाचे मोठे स्टॉल लागलेले दिसुन येतात. सध्या मात्र कोविडमुळे काही प्रतिबंध असल्याने यात्रा भरलेली नाही. अशा निसर्गरम्य असणाऱ्या परिसरास पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी भाविकातुन होत आहे.