‘औरंगाबाद’ लॉकडाऊन रद्दचे काय आहे कारण पहा …

औरंगाबाद दि.31 मार्च कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये आजपासून सुरू होणारा लॉकडाऊन (lockdown) रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली.
(See what is the reason for canceling ‘Aurangabad’ lockdown …)
औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन (lockdown)जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन सुरू होणार असल्यामुळे बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी मंगळवारी रात्री पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.
लावलेला लॉकडाऊन रद्द का झाला याबाबत तर्कवितर्क लावली जात आहेत. यात प्रामुख्याने लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे लॉकडाऊन रद्द झाल्याची चर्चा होत आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध केला होता. एआयएमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Itiyaz Jalil) यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. भाजप आणि मनसेच्या नेत्यांनीही लॉकडाऊनच्या विरोधात भूमिका घेतली. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील (Itiyaz Jalil) यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात भव्य मोर्चा आयोजित करुन आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती.
लॉकडाऊन रद्द करण्यामागचे दुसरे प्रमुख कारण हे राज्यात आगामी काळात लॉकडाऊन लावण्याचा मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केलेली घोषणा आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी काल महत्त्वाची माहिती दिली आहे. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. पण तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. त्यामुळेच लॉकडाऊनची पूर्वतयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊनला सर्वसामान्य जनतेसह विविध पक्ष व संघटनांनी विरोध दर्शविला असून या कारणासह आगामी काळात राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन लावण्याची केलेली तयारी या दोन कारणामुळे औरंगाबादचे लॉकडाऊन रद्द केले असल्याची चर्चा आहे. देशातील सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यात औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे या दहा जिल्ह्यात राज्य शासन लॉकडाऊनचा निर्णय घेवू शकेल हे प्रमुख कारण समजले जात आहे.