नितीशकुमारांच्या आक्षेपानंतर बिहारमध्ये शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ गोत्यात

पाटणा– दि.४- बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतला. जेडीयूच्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे उमेदवार बिहार विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरू शकणार नाहीत असे आदेश दिले आहेत. शिवसेना (Shiv Sena) बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Vidhansabha Polls) 50 जागा लढवणार आहे.
शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक प्रसिद्ध किंवा ओळखीचे राजकीय पक्ष नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाण ही निशाणी देण्यात येऊ नये, अशी मागणी जेडीयूने निवडणूक आयोगाकडे केली होती. बाण हे जेडीयू पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर नितीश कुमार यांच्या जेडीयूचा आक्षेप होता. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जातात. असा दावा जेडीयूने केला होता. यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिहार निवडणूकीत धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत.
बिहारमध्ये शिवसेनेच्या मतांच्या चढत्या आलेखामुळे जेडीयूने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी धसका घेतला आहे, अशी टीका शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही अंदाजे अंदाजे 50 जागा लढवतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आज आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात आम्ही मागणी केली आहे की, फ्री सिम्बॉलपैकी एक चिन्ह आम्हाला देण्यात यावे. शिवसेनेचे सर्व उमेदवार त्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.