धक्कादायक … भीक मागायला लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; औरंगाबादेत मुलांची होतेय विक्री.

औरंगाबाद दि.3 सप्टेंबर – आई-वडील आणि नातवाईकांनीच भिकाऱ्यांच्या टोळीला मुले विकल्याची घटना औरंगाबादेत (Aurangabad) समोर आली आहे. मुलांना भीक मागायला लावणाऱ्या एका रॅकेटचा (racket) पर्दाफाश झाला आहे. यासाठी या लोकांनी दोन मुले तब्बल दीड लाखात विकत घेतल्याची घटना मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या (Police Station) हद्दीत बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.
(Shocking … exposure of a begging racket; Children are being sold in Aurangabad.)
औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरातील रामनगर येथील रहिवासी कांताबाई खंडागळे यांनी जनाबाई उत्तम जाधव ही महिला तिच्या घरात असलेल्या लहान मुलांचा अमानुषपणे छळ करत असल्याचे वारंवार पाहिले होते. बुधवारी रात्री त्यांनी समाजसेवक देवराज वीर यांना फोन करून जनाबाई लहान मुलास क्रूरपणे मारहाण करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर देवराज वीर घटनास्थळी पोहोचले. तेव्हा जनाबाई आणि तिची मुलगी सविता संतोष पगारे या दोघी एका मुलाला लाकडी पट्टी आणि हाताने मारत होत्या.
हृदय पिळवटून टाकणारा हा प्रकार पाहून वीर यांनी पाच वर्षाच्या मुलास त्यांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर पोलिस कर्मचारी खान यांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी (Police) या दोन महिला आणि मुलांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बालकल्याण संरक्षण कक्षाच्या (Child Welfare Protection Cell) अधिकारी अॅड सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बाजारे, कैलास पंडित यांना बोलावून घेतले.
या दोन्ही मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. तेव्हा ही मुले बोलती झाली. मला भीक मागण्यासाठी येथे आणले असून तसे नाही केले तर खूप भयंकर शिक्षा केली जाते, असेही सांगितले. त्यांचे ऐकले नाही तर लाथाबुक्क्यांनी मारहाण, बाथरुममध्ये झोपायला लावणे, तासन् तास पाण्यात बसवून ठेवले जात होते, अशी धक्कादायक माहिती मुलांनी सांगितली.
या प्रकरणातील महिला आरोपींनी आम्ही ही मुले दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. यासाठी 100 रुपयांच्या बाँडवर व्यवहार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र संपूर्ण तपासाअंती मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला आरोपी सविता पगारे हिने 5 वर्षीय मुलाला बुलडाणा जिल्ह्यातून आई-वडिलांकडून 55 हजार रुपयांत विकत घेतले तर दुसऱ्या 2 वर्षीय मुलाला जालना जिल्ह्यातून 1 लाख रुपयांच्या बाँडवर दत्तक घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी समाजसेवक देवराज नाथाजी वीर यांनी फिर्याद (Complaint) दिली. दरम्यान, दोन्ही मुलांची रवानगी बालसुधारगृहात (Juvenile Correctional Institution) करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक (Police Inspector) मनोज पगारे यांनी दिली.