धक्कादायक …. तर जूनमध्ये देशात प्रतिदिन 2 हजार 320 मृत्यू; टास्क फोर्सच्या लान्सेट कोविड-19 आयोगाचा दावा.

नवी दिल्ली दि.17 एप्रिल- भारतात यापुर्वी 1750 जणांचे मृत्यू कोरोना संबंधित आजाराने झालेले पाहिले असतील. पण, ही संख्या जुनच्या पहिल्या आठवड्यात 2 हजार 320 पर्यंत वाढू शकते, असा धक्कादायक दावा भारतातील कोरोना बाधितांसाठी निर्माण केलेल्या टास्क फोर्सच्या लान्सेट कोविड-19 आयोगाने (Task Force’s Lancet Covid-19 Commission) आपल्या अहवालात केला आहे.
(Shocking …. then 2 thousand 320 deaths per day in the country in June; Task Force’s Lancet Covid-19 Commission claims.)
‘मॅनेजिंग इंडियाज सेकंड कोविड वेव्ह : अर्जंट स्टेप’ या नावाने केलेल्या या अहवालात कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत असणाऱ्या गोष्टींवर प्रकाश झोत टाकण्यात आला आहे. त्यात 15 उपायही सुचवण्यात आले आहेत. व्यापक लसीकरण मोहीम, मेळाव्यांवर तात्पुरती बंदी, कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग अचानक वाढण्यासाठी निमित्त मात्र ठरलेल्या कारणांचा शोध आदींचा त्यात समावेश आहे.
या अभ्यासात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट दोन मुख्य प्रकारे वेगळी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान रुग्णवाढीची संख्या 10 हजाराहून 80 हजारावर अवघ्या 40 दिवसांत गेली. मात्र सप्टेंबर 2020 मध्ये त्यासाठी 83 दिवस लागले होते. तुलनेत दुसऱ्या लाटेतील बाधित लक्षणे विरहीत किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी असणारे आहेत. त्यामुळे रूग्णालयात दाखल करावे लागलेले अथवा मृत्यू पावणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे.
दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांत 2 लाख 17 हजार 353 बाधित होण्याचा नवा उच्चांक निर्माण झाला. त्यामुळे देशातील सक्रिय कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 15 लाख 69 हजार 743 आहे. ती एकूण बाधितांच्या संख्येत 10.98 टक्के आहे. गेल्या 24 तासांतच 97 हजार 866 सक्रिय बाधितांच्या (Corona Positive) संख्येमध्ये वाढ झाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तिसगढ, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, आणि प. बंगाल या 10 राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 79.10 टक्के आहे.
केंद्र सरकारची चिंता वाढली
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या (Corona Virus) देशातील फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयावहरीत्या वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकारची चिंता वाढली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी देशातील कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील विविध आरोग्य सेवांचा दौरा करून कोरोनावरील पुढील रणनीती बाबत डॉक्टरांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन यांनी शुक्रवारी एम्सचा दौरा केला. यावेळी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि रुग्णालयातील अन्य डॉक्टर उपस्थित होते. यावेळी डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) म्हणाले की, देशभरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही विविध रुग्णालयांचा दौरा करत आहोत. तसेच पुढील तयारीसाठी डॉक्टर्स आणि त्यांच्या टीमसोबत चर्चाही करत आहोत. तुम्हाला माहिती असेलच की गेल्यावर्षी कोरोनाविरोधात लढाईला सुरुवात झाली होती तेव्हा प्रत्येक बाबतीत उणिवा दिसून येत होत्या. मात्र आम्ही अनुभवामधून खूप काही शिकलो आहोत. तसेच आमचा आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढला आहे.
2021 मध्ये 2020 च्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र 2021 मध्ये आमच्या डॉक्टरांकडे कोरोनाविरोधात लढण्याचा अनुभव अनेक पटींनी अधिक आहे. देशात केंद्र सरकारकडे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर्स (Ventilators) उपलब्ध आहेत. देशतील कुठल्याही रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सची टंचाई होऊ दिली जाणार नाही. आतापर्यंत कुठल्याही राज्याने आमच्याकडे व्हेंटिलेटर्स (Ventilators) ची मागणी केलेली नाही. बहुतांश राज्यांनी केंद्राकडून पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सचासुद्धा वापर केलेला नाही. त्यांच्याकडे व्हेंटिलेटर लावण्यासाठी जागा नाही, अशी माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.