कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवार व संजय राऊत यांचे चोख प्रत्यूत्तर…

मुंबईः दि.२८- बेळगाव (Belgoan) सोडा, मुंबई (Mumbai) देखील कर्नाटकचाच भाग आहे’, असं विधान सीमावादावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे (Karnataka) उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Saudi) यांनी केलं होतं. याला चोख प्रत्यूत्तर म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील असं तर शिवसेना (Shivsena) नेते खा. संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता ठाकरे आहेत, कर्नाटकच्या सरकारने हे सुद्धा आता विसरु नये, असे ठणकावले.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहील. कर्नाटकमधल्या नागरिकांना बरं वाटावं, म्हणून त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवं’, असं ते म्हणाले. तसेच, बेळगाव (Belgoan) आणि आसपासच्या मराठी गावांविषयी बोलताना अजित पवारांनी केंद्र सरकारवर देखील टिप्पणी केली. ‘ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत सुचवलं आहे. त्याचा मुंबईशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्या भागात अनेक वर्ष आमदार, महापौर, नगरसेवक मराठी निवडून येत होते. तिथल्या बहुसंख्य लोकांची मागणी तशीच होती. नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावं जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो’, असं ते म्हणाले. बेळगाव हे कर्नाटकचं विभाज्य अंग आहे. महाराष्ट्रातल्या नेतेमंडळींनी कितीही ओरड केली, तरी चंद्र-सूर्य असेपर्यंत बेळगाव कर्नाटकमध्येच राहणार. बेळगाव सोडा, मुंबई (Mumbai) देखील कर्नाटकचाच भाग आहे’, असं विधान सीमावादावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Saudi) यांनी केलं होतं. यावर शिवसेनेचे (Shivsena) नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, केवळ एका राज्यापुरता कर्नाटकचा (Karnataka) प्रश्न मर्यादित नसून तो दोन राज्यांतील सीमाप्रश्न आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना हे कळले पाहिजे. थोडा इतिहास त्यांनी समजून घेतला पाहिजे, असे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता ठाकरे आहेत, कर्नाटकच्या सरकारने हे सुद्धा आता विसरु नये, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.