राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतीचे निकाल…. पाटिल, मुंडे, विखे, पेरे, अण्णा, पवार, दानवे, मोहिते, शिंदे, लोणीकर यांचे काय झाले…

आज ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होत असून, राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. आजच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भास्करराव पेरे पाटील (Pere Patil) यांचा पराभव चर्चेचा विषय ठरत आहे. परळीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले आहे. इतर काही प्रमुख लढतीतील जय पराजयाचा हा आढावा.
औरंगाबादः आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या गावाची किर्ती संपूर्ण राज्यात घेऊन जाणारे भास्कर पेरे यांनी त्याचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. यामध्ये त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांनीसुद्धा निवडणूक लढवली होती. मात्र, येथे भास्करराव पेरे (Pere Patil) यांच्या संपूर्ण पॅनेलचा पराभव झाला आहे. त्यांच्या मुलीसह त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. एकूण ११ जागांपैकी ८ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तिन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले आहे. येथील ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवला आहे.
अहमदनगर: तीस वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या आदर्शगाव हिवरेबाजार (Hivre Bajar) इथं पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांच्या आदर्श गाव पॅनलचा विजय झाला आहे. सातच्या सात जागांवर आदर्श गाव पॅनलचे उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे हिवरे बाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांची सत्ता अबाधित राहिली आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्या गावात म्हणजेच राळेगणसिद्धीमध्ये कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर अण्णांच्या (Anna Hajare) विचारांच्या ग्रामविकास पॅनलने राळेगणसिद्धीमध्ये सर्वच्या सर्व ७ जागा जिंकल्याचे समोर आले आहे.
लोणी खुर्दमध्ये सत्ता परिवर्तन होऊन विखें पाटलांनी (Vikhe Patil) सत्ता गमावली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूने उभे राहिले आहेत, हे निकालातून स्पष्ट होण्यास सुरुवात झाली असून लोणी खुर्द गावात भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patil) यांना मोठा धक्का बसला आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर झालं असून १७ पैकी १३ जागा जिंकत परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या लोणी खुर्द गावात तब्बल २० वर्षानंतर सत्तांतर झालं आहे. त्यामुळे या गावावर एकहाती वर्चस्व असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
जालनाः जालन्यात भाजपाला मोठे यश प्राप्त झाले आहे. बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या परतूर तालुक्यातील अकोली ग्रामपंचायतीचे जय मल्हार पॅनेलमधील ७ पैकी ६ उमेदवारी विजयी झाले आहे. त्यामुळे अकोली गावात भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे.
भोकरदन तालुक्यात भाजपला जोरदार हादरा बसलाय. भाजपच्या ताब्यात असलेली रेणुकाई पिंपळगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला विजय मिळालाय. या ठिकाणच्या १३ पैकी १२ जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. पारध, वालसावंगी, सिपोरा बाजार ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता गमावल्याचे पाहायाला मिळाले. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जल्लोष सुरु आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंसाठी (Raosaheb Danve) हा जोरदार धक्का मानला जातोय.
सोलापूर: अकलूज ग्रामपंचायत निडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (Mohite Patil) यांच्या पॅनलने वर्चवस्व कायम राखलं आहे. मोहिते-पाटील (Mohite Patil) यांच्या पॅनलने १६ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील गटाच्या संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे.
जळगाव : जामनेरमध्ये भाजपच्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खातं उघडलं आहे. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वाकोदमध्ये राष्ट्रवादीने खातं उघडलं आहे. तर एकूण अकरा जागा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.
परळीः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय मिळाला आहे. वंजारवाडी आणि रेवली इथल्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीनं बिनविरोध विजय मिळवला असून सरफराजपुर आणि मोहा इते निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चवस्व प्रस्थापित केलं आहे. परळी पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकितही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचं दिसून येत आहे.
राम शिंदेंना धक्का
भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांना धक्का बसला आहे. त्यांच्या चौंडी गावात राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलनं विजय मिळवला आहे. आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांची ग्रामपंचायत निवडणूकीत सरसी दिसून आली.
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तातुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये शिवसेनेने सहा जागा जिंकत बाजी मारली आहे. ९ जागांपैकी ६ जागावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. खानापूर हे चंद्रकांत पाटील (Chandakant Patil) यांचं जन्मगाव आहे. या गावात गेल्या पंचवार्षिक योजनेत भाजपची सत्ता होती. खानापूर ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकीत या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता येणार यासाठी चुरस होती.