राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, माकप, शिवसेना व एमआयएम एकत्र;

किल्लेधारूर दि.८(वार्ताहर) नवीन कृषी कायद्याला विरोध म्हणून आज विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित भारत बंद मध्ये एकमेकासमोर सतत दंड थोपटून असणाऱ्या राजकीय पक्ष रास्ता रोकोच्या माध्यमातून एकत्रित आलेले पहावयास मिळाले.
गेल्या बारा दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनात देशभर बंद पाळण्यात येत आहे. मुंबई पुण्यासह थेट ग्रामीण भागात याचा परिणाम दिसुन येत आहे. बीड जिल्ह्यातही भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. धारुर शहरात भारत बंदला पाठिंबा देत भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केला. शेतकऱ्यांच्या समर्थनात आज एकमेकांच्या सतत विरोधात असणाऱ्या एमआयएम (aimim) व शिवसेनेसह (shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस, शेतकरी संघटना, माकप आदी पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित दिसुन आले. यात राष्ट्रवादीचे (NCP) नेते माधव निर्मळ, प्रा.इश्वर मुंडे, नितिन शिनगारे, शिवसेनेचे (Shivsena) नारायण कुरुंद, राजकुमार शेटे, नितिन सद्दीवाल, माकपचे कॉ. मोहन लांब, कॉ. काशिराम सिरसट, कॉ. आशोक थोरात, एमआयएमचे (aimim) शेख सिद्धिक, शेख मुबीन, आफरोज पठाण सहभागी होते.