जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्रीवर निर्बंध; लागणार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी.

मुंबई दि.7 अॉगस्ट – महाराष्ट्रात जमिनीचे तुकडे पाडून खरेदी विक्री करण्यावर राज्य शासनाने आता निर्बंध (restrictions) आणले आहेत. यामुळे जमिनीचे गुंठ्यात तुकडे पाडून त्याची थेट खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. जमिनीचे गुंठ्यांत तुकडे पाडून त्याची खरेदी अथवा विक्री करण्यासाठी आता सक्षम प्राधिकरण अथवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या निर्णयाला मात्र सामान्य जनतेतून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Restrictions on sale and purchase of land in the state; Collector’s permission required.)
आतापर्यंत राज्यात जमिनीचे तुकडे पाडुन जमिनीची खरेदी विक्री करता येत होती. परंतू आता अशा प्रकारच्या खरेदी विक्रीवर निर्बंध लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. समजा एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्या सर्व्हे नंबरमधील एक, दोन अथवा तीन गुंठे जागा तुम्ही विकत घेणार असाल तर, त्याची दस्त नोंदणी होणार नाही. त्यासाठी त्या सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यात गुंठ्यांचे तुकडे पाडून त्याला जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणं आवश्यक असेल. अशाच ले-आऊटमधील (Layout) गुंठ्याने विकत घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी होणार आहे.
दरम्यान यापूर्वी तु़कड्यात जमिनीची खरेदी अथवा विक्री केली असेल तर आता अशा व्यवहारासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र एखाद्या जमिनीचे भूमी अभिलेख विभागामार्फत (Department of Land Records) हद्दी निश्चिती होऊन मोजणी नकाशा देण्यात आला असेल तर अशा तुकड्याने खरेदी -विक्री (Buy-sell) केलेल्या जमिनीसाठी ही परवानगी आवश्यक राहणार नाही.
गेल्या काही वर्षात राज्यात भुमाफीयांचे जाळे तयार झालेले आहे. यामुळे जमिनीच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. मुळात, महसूल कायद्यात तुकडेबंदी लागू आहे. मात्र तरीही असे व्यवहार होऊन त्याची दस्त नोंदणीही होत आहे. त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक (Registration and stamping) नियंत्रक विभागाने हे परिपत्रक जारी केलं आहे.