औरंगाबाद नामातंराबाबत आज आणखी दोन मोठ्या नेत्यांनी दिली ही प्रतिक्रिया….

मुंबईः दि.४- औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले नंतर आता या राजकीय वादात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुणे जिल्ह्याचं नामकरण संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हा विषय महाआघाडी सरकारच्या अजेंड्यात नसल्याचे सांगत बगल दिली आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुक तोंडावर आलेली असताना भाजपा व मनसेने औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. औरंगाबाद शहराला संभाजी महाराजांचं नाव देण्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र, आक्षेप घेतला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगाबाद ऐवजी पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. “पाच वर्ष सरकारमध्ये असताना भाजपा-शिवसेनेनं औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव का बदललं नाही, याचा खुलासा त्यांनी आधी करावा. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. मुघलाच्या काळात औरंगाबाद दुसरी राजधानी होती. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक राहायला हवे. दुसरा भाग संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यात अंत्यसंस्कार झालेले आहेत. पुणे जिल्ह्यातील वडूज गावात त्यांची समाधी आहे. त्यामुळे संभाजी महाराजांच स्मरण राहावं, असं वाटत असेल तर योग्य भूमी पुणे शहर आणि जिल्हा आहे. त्यामुळे पुण्याला संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अधिक उचित होईल,” असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना औरंगाबाद नामांतर विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर औरंगाबाद (Aurangabad) नामांतर विषय नसल्याची प्रतिक्रिया देत विषयाला बगल दिली.