धारुर तालुक्याची परिस्थिती गंभीर; 24 तासात 81 बाधित; प्रशासनाचे गचाळ नियोजन.

किल्लेधारूर दि.23 एप्रिल – धारुर तालुक्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील कारी व कोथिंबीरवाडी येथे काल दि.22 गुरुवारी वाढती कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेऊन ॲन्टीजन तपासणी (Antigen test) मोहिम घेण्यात आली. यात कारी येथे 23, कोथिंबीरवाडी येथे 15 तर अंजनडोह येथे एक रूग्ण असे 39 कोरोना बाधित आढळून आले.
(The situation in Dharur taluka is critical; 81 interrupted in 24 hours; The administration’s clumsy planning.)
शहरातील कोविड केअर सेंटर येथील तपासणी केंद्रातून पाठवण्यात आलेल्या 89 आरटिपीसीआर चाचणी पैकी 20 तर 37 ॲन्टीजन तपासणीत 5 कोरोना बाधित आढळले आहेत. आज सकाळ पासून येथील कोविड केअर सेंटरमध्ये 34 जणांपैकी 12 जणांची ॲन्टीजन चाचणी (Antigen test) कोरोना पॉझिटीव्ह आली तर तर भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 पैकी 5 जणांची ॲन्टीजन चाचणी पॉझिटीव्ह आली असल्याची माहिती डॉ.अमोल दूबे यांनी दिली. तालुक्यात गेल्या 24 तासात तब्बल 81 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आले आहेत. आजवरची ही सर्वाधिक संख्या आहे.
धारूर तालुक्यातील कांही गावांत गेल्या कांही दिवसांपासुन कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे धारूर तालुका आरोग्य विभागाच्या तालुक्यातील सहा गावात ॲन्टीजन ड्राईव्ह मोहिम राबवली. दि.22 गुरुवार रोजी कारी व कोथिंबीरवाडी येथे ॲन्टीजन तपासणी करण्यात आली. यात कारी येथे एकुण 95 जणांची ॲन्टीजन तपासणी करण्यात आली. त्यापैकी 23 जण पाॅझीटीव्ह आले. तर कोथिंबीरवाडी येथे 127 जणांची ॲन्टीजन तपासणी करण्यात आली. यापैकी 15 जण पाॅझीटीव्ह आले तर अंजनडोह येथील उर्वरित 95 लोकांच्या तपासणी केवळ 1 जण बाधित आढळला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. मारोती लगड यांनी दिली.
तालुक्यात सध्या कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात 214 कोरोना बाधित उपचार घेत आहेत. एकुण 260 पैकी 46 खाटा सध्या रिक्त आहेत. दररोज बाधितांचा आकडा वाढत असून तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र ढेपाळलेली दिसत आहे. येथील पोलिस प्रशासनाकडून रस्त्यावर उतरुन नागरिकांना चोप देण्याचे काम व सुचना देण्याचे काम सुरु आहे. मात्र शिथिल वेळेत स्थानिक नगर पालिका प्रशासन सपशेल फोल ठरली आहे. तर पालीका, आरोग्य, महसुल व पोलिस प्रशासनात ताळमेळ नसल्याचेही दिसुन येत आहे.
प्रशासनातील निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. शहर व तालुक्यात कुठेही कडक निर्बंधाचे पालन होत नसल्याचे दिसुन येते. तर प्रशासन याला गांभिर्याने घेत नसल्याचा हा परिणाम असल्याचे सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पदाचा तालुका आरोग्य अधिकारी नसल्याने आरोग्य प्रशासन अक्षरशः कोलमडून गेले आहे. केवळ औपचारिकरित्या वेगवेगळ्या मोहिमा राबविल्या जात असून लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार दिसुन येत आहे. प्रशासनाने तात्काळ पदाचा तालुका आरोग्य अधिकारी नेमावा अशी मागणी होत आहे.