महाराष्ट्रात पुन्हा भीषण अपघात….. १६ ठार तर ५ गंभीर

रावेर दि.१५- रविवारी रात्री १२ च्या सुमारास जळगाव-कीनगावनजीक मनूदेवी मंदिराच्या परिसरात भीषण अपघात झाला. धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पो उलटल्याने झालेल्या या भीषण अपघातात १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यावल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एकीकडे शासन रस्ते विकासावर भर देत असताना अपघाताची शृंखला मात्र सुरुच असल्याचे दिसत आहे. रस्ते अपघातात प्रतिवर्षी हजारो लोकांचा बळी जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलेले आहे. काल रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास जळगाव- कीनगाव जवळ पपईची वाहतूक करणाऱ्या टेम्पो पलटून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात १६ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी आभोडा येथील १२, केरळ येथील २ तर रावेर येथील दोघांचा समावेश आहे. जखमींपैकी २ जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. यावल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.
काय आहे घटना
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमएच १९ : झेड-३५६८ या क्रमांकाच्या आयशर टेम्पो वाहनात काल सायंकाळी धुळे जिल्ह्यातील नेरी-कुसुंबा येथे पपई भरली. यानंतर हे वाहन रात्री रावेरकडे निघाले. रात्री साडेबाराच्या सुमारास चालक शेख जहूर बद्रुद्दीन मोमीन यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो उलटला. यावल तालुक्यातील किनगावजवळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर हा अपघात (Accident) झाला. या टेम्पोमध्ये महिला मजूर आणि लहान मुलेही प्रवास करत होती. टेम्पो उलटल्याने १६ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये काही मजूर आणि लहान मुले, महिलांचा समावेश आहे. पोलिसांना (Police) या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस (Police) करत आहेत.