विजेच्या करंटने मासे पकडताना दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू;

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर)धारुर Dharur तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे दि.१२ गुरुवारी नदीत करंट सोडून मासे पकडत असताना करंट लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सध्या पाऊसपाणी चांगला झाल्याने डोंगरात वाहणाऱ्या नदी ओढ्यांना चांगले पाणी आहे. या नदी ओढ्यात माशांचे प्रमाण असल्याने तरुण वेगवेगळ्या पध्दतीने मासेमारी करतात. नदीत विजेचे करंट सोडून मासेमारी करण्याचा जीवघेना प्रकार रात्री समोर आला. तालुक्यातील भोगलवाडी ग्रामपंचायत तहत असलेल्या काळ्याचीवाडी येथे या प्रकारातून दोन तरुणांचा जीव गेल्याची घटना घडली. अंधार पडला असताना दोघे घरी परत आले नसल्याने शोध घेत असताना सदरील प्रकार उघड झाला. पाण्यात करंट सोडून मासे धरत असताना त्याच पाण्यात उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात समाधान सहदेव रुपनर (२३) व दिपक मारुती रुपनर (२२) या दोन तरुणांचा समावेश आहे. सदरील प्रकारामुळे ऐन दिवाळीत रुपनर कुटूंबियावर दुखाचा डोंगर कोसळला असुन गावात शोककळा पसरली आहे. सदरील तरुणांचे प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असुन धारुर पोलीस Dharur Police पुढील तपास करत आहेत.