विजयादशमीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करू; कोरोना काळात समाजातील नवदुर्गांनी केलेले कार्य ठरत आहे संकट मोचक – धनंजय मुंडे

दसऱ्यानिमित्त दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा

परळी दि.२४ : रविवारी देशभरात साजरा होत असलेल्या विजयादशमी – दसऱ्याच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करू, कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी समाजातील नवदुर्गांनी केलेले कार्य संकट मोचक ठरले असून त्यांच्या सन्मानार्थ यावर्षीचा दसरा साजरा करू असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दसऱ्याच्या पूर्व संध्येला त्यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून यंदाचा दसरा साधेपणाने व कोरोनाविषयक नियमांचे पालन करून साजरा करावा असे आवाहनही केले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये विविध धार्मिक सण – उत्सव, महत्वाचे दिवस तसेच राष्ट्रीय सण देखील कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अत्यंत साधेपणाने व घरच्या घरून साजरे करावे लागले. नवरात्रोत्सव तथा विजयादशमी हा भारतीय सण – उत्सव परंपरेतील अत्यंत महत्वाचा व मोठा उत्सव आहे. परंतु या उत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी साधेपणाने दसरा साजरा करावा असे आवाहन ना. मुंडे यांनी केले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी होणारे रावण दहन सार्वजनिक सीमोल्लंघन असे कार्यक्रम टाळावेत, तसेच त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. एकमेकांना प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याऐवजी समाज माध्यमांच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात असेही ना. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात विकासाचे सीमोल्लंघन करू

विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाले असून मागील एक वर्षात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच सरकारी तिजोरीला लागलेले आर्थिक निर्बंध अशा काही कारणांनी अपेक्षित गतीने विकासकामे हाती घेता आली नाहीत. जिल्ह्याने कोरोनाचा सामना अत्यंत नेटाने लढा देऊन केला आहे, त्यासाठी आरोग्य यंत्रणांना मोठी बळकटी देण्याचे काम आपण करू शकलो; नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हा प्राधान्य क्रमच सरकारने ठरवला होता. येणाऱ्या काळात आर्थिक निर्बंध जसजसे शिथिल होतील तसतसे पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ उद्देशाकडे वळत जिल्ह्याचा मागील अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दिशेने मोठी व सकारात्मक पावले उचलणार आहोत. हा दसरा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या सीमोल्लंघनाची सुरुवात ठरेल असा विश्वास यानिमित्ताने धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे.

#Dhananjay Munde

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!