राज्यात टाळेबंदी नाही, कठोर निर्बंधावर सहमती; बीडमध्ये लॉकडाऊनला विरोध.

बीड दि.25 मार्च – राज्यातील कोरोना रुग्णांची (Corona Positive) वाढती संख्या लक्षात घेता टाळेबंदी पुन्हा लागू करायची की निर्बंध अधिक कठोर करायचे, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. यावर सरसकट टाळेबंदी नको त्याऐवजी निर्बंध अधिक कठोर करण्यावर मंत्र्यांमध्ये सहमती झाली. तसेच राज्यातच रुग्ण जास्त कसे, अशी शंकाही या वेळी उपस्थित करण्यात आली. काल राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन विषयी चर्चा झाली. दरम्यान, बीडमध्ये जाहिर केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनला मोठा विरोध होत आहे.
(There is no lockout in the state, agreement on strict restrictions; Opposition to lockdown in Beed.)
कोरोनाचे रुग्ण (Corona Positive) वाढत असताना कोणते उपाय योजायचे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जास्त रुग्ण असलेल्या काही शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात टाळेबंदी लागू करायची का, यावर बराच खल झाला. राज्यात सध्या सरासरी २५ हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. हा कल असाच राहिल्यास टाळेबंदीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करण्यात आले. टाळेबंदीऐवजी सध्या लागू असलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात यावे, अशी सूचना मंत्र्यांकडून करण्यात आली.
यापूर्वी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा अनुभव फारसा चांगला नाही. तसेच त्यातून आर्थिक गाडी रुळावरून घसरते. यामुळे टाळंबेदीचा सध्या तरी विचार होऊ नये, असेच सर्वांचे मत झाले. अगदीच शेवटचा पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करता येईल, असाच मंत्र्यांचा सूर होता. निर्बंध अधिक कठोर करण्याचे संकेत देण्यात आले. यानुसार गर्दी टाळण्याकरिता काही कठोर उपाय योजण्यात येणार आहेत.
मुंबई, ठाण्यात रेल्वे प्रवासासाठी वेळेची काटेकोरपणे अंमलबजावणी के ली जाईल. यानुसार सर्वसामान्य प्रवाशांना दुपारी १२ नंतर आणि रात्री ९ नंतरच प्रवास करता येईल. हॉटेल्स, बार रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवता येणार नाहीत. व्यायामशाळा, तरण तलाव आदींवर निर्बंध लागू केले जाणार आहेत. होळीच्या सुट्टीच्या वेळी पर्यटनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून कठोर उपाय योजले जाणार आहेत.
दरम्यान, काल बीड (Beed) जिल्ह्यात दि.26 मार्च ते 4 एप्रिल असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन (lockdown) जाहिर करण्यात आला. या लॉकडाऊनला विविध स्तरावर विरोध दर्शवला जात आहे. व्यापाऱ्यांनी सर्रास लॉकडाऊनला (lockdown) विरोध असल्याचे जाहिर केले. यासोबतच एआयएमआयएम या पक्षाकडूनही उघड विरोध दर्शवण्यात आला आहे. वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी बीड, अंबाजोगाई येथे लॉकडाऊनला विरोध दाखवत आंदोलन छेडले. वाढत्या विरोधामुळे जिल्हा प्रशासन भुमिका बदणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.