खळवट लिमगाव दुर्घटनेतील तिसरा मृतदेह सापडला; प्रशासनाच्या कामाबाबत ग्रामस्थांत नाराजी

वडवणी दि.२३(प्रतिनिधी) माजलगाव मध्यम प्रकल्पाच्या बॅकवॉटर चे पाणी वाढल्याने ग्रामस्थांना रहदारीसाठी बोटीचा वापर करावा लागत आहे. शेतातून घरी येत असताना जोराच्या वार्‍यामुळे बोटीने हेलकावे खावून पाच जण पाण्यात पडल्याची घटना काल घडली. त्यातील दोघे जण पाण्याबाहेर आले मात्र आईसह मुलगा व भाची पाण्यात बुडाल्या ची घटना वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे घडली. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह सापडले असून तिसरा मृतदेह आज दुपारी शोधण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र प्रशासनाच्या कामगिरी बाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे माजलगाव प्रकल्पाच्या बॅक वॉटर ने विळखा घातला आहे. धरण शंभर टक्के भरल्याने धरणातील पाणी दूरवर पोहोचले आहे. या गावातील नागरिकांना शेतात जाण्यासाठी बोटीचा (चप्पू) आधार घ्यावा लागतो. काल दि.२२ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भारत राजाभाऊ फरताडे व अंतिकाबाई इंद्रजीत नाईकवाडे यांच्यासह पाच जण आपल्या शेतातून गावाकडे बोटी मधून येत असताना जोरदार वाऱ्यामुळे बोटीने हेलकावे खाल्ल्याने बोटीतील पाच जण पाण्यात पडले. त्यातील भारत व अंतिकाबाई या दोघांना पोहता येत असल्याने पाण्याबाहेर येण्यात यशस्वी झाले. मात्र तिघे पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती कळताच वडवणीचे तहसीलदार किसन सांगळे यांनी मंडळाधिकारी, तलाठी, पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यासह खळवट लिमगाव कडे धाव घेतली. ग्रामस्थ व प्रशासनाने बुडालेल्या सुषमा भारत फरताडे वय (३०) वर्षे, आर्यन भारत फरताडे वय (५) व पुजा काळे वय (८) या तिघा जणांचा शोध सुरू केला. दरम्यान रात्री उशिरा सुषमा फरताडे व आर्यन फरताडे या दोघांचे मृतदेह सापडले. आज दुपारी साडेबारा वाजता पुजा काळे वय (८) हिचा मृतदेह शोधण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. या घटनेने खळवट लिमगाव मध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या मदत कार्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!