महाराष्ट्रात तब्बल साडेबारा लाख सदोष आरटी-पीसीआर किट वितरित… आरोग्य विभागात खळबळ
आरोग्य मंत्र्यांचे संबंधीत कंपनीवर कारवाईचे संकेत

औरंगाबाद दि.१३(प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोना (corona) चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर (RT-PCR) किट्स मध्ये आक्टोंबर महिन्यात तब्बल साडेबारा लाख सदोष किट वितरित झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत यास दुजोरा देत संबंधित कंपनीवर कठोर कारवाईचे संकेतही दिले आहेत.
गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना (corona) बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक वृत्त येत आहे. मात्र रुग्णांना करोनाची लक्षणे असताना त्यांची ‘आरटी-पीसीआर’ (RT-PCR) चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्यामुळेच सदोष ‘किट’चे गौडबंगाल समोर आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात मौन साधले होते. काही दिवसांपुर्वी औरंगाबाद व जालनामध्ये अशा किटचा वापर झाल्याचे उघड झाले होते. यात ‘जीसीसी बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’चे ‘किट’ अयोग्य व असमाधानकारक असल्याचा अहवाल ‘आयसीएमआर’ने (एनआयव्ही) दिला आहे. रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळून येत असतानाही ‘आरटी-पीसीआर’ (RT-PCR) चाचण्या ‘निगेटिव्ह’ येत होत्या. या ‘किट’ सदोष असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा वापर थांबवण्यात आला आहे व त्याऐवजी दुसऱ्या ‘किट’चा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात तब्बल साडेबारा लाख सदोष किट वितरित झाल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. कोरोना (corona) बाबत प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त असताना वापरण्यात येत असलेल्या किट्स सदोष असल्याने याबाबत शंका निर्माण झाली आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होवून दोषी कंपनीवर कारवाई करण्याचे संकेत आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले.