बीड पाठोपाठ लातूर मध्येही ४०० कोंबड्या दगावल्या….

लातूरः दि.१०- कोरोनानंतर देशात बर्ड फ्लूचे (Bird flu) संकट ओढावले आहे. राजस्थान, पंजाबपाठोपाठ आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने एंट्री केल्याची भीती वर्तवली जात आहे. काल बीडमध्ये (Beed) २६ कावळे मृत आढळल्यानंतर आज लातूरमध्ये (Latur) ४०० कोंबड्या दगावल्याची घटना समोर आली आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पोल्ट्री फार्म मधील ४०० कोंबड्या अचानकपणे दगावल्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करुण नमुने घेतले असून कोंबड्या दगावल्याने लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. केंद्रेवाडी येथे सदाशिव मुरलीधर केंद्रे यांचा कुक्कूटपालन व्यवसाय आहे. दिड महिन्यापुर्वी अहमदनगर येथून आणलेल्या ८०० कोंबड्यापैकी तब्बल ४०० कोंबड्या शनिवारी मृत अवस्थेत आढळल्या. केंद्रे यांनी याबाबतीत प्रशासनाला सुचना दिल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी भेट दिली. कोंबड्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने अहवाल येईपर्यंत दहा किलो मिटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. केंद्रवाडी गावात वाहनांना ये -जा करण्यास देखील मनाई करण्यात आली असून लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी असे आदेश काढले आहेत. याशिवाय अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथे ६० कोंबड्या दगावल्या आहेत. अद्याप राज्यात बर्ड फ्लू (Bird flu) आल्याचे निष्पन्न झाले नसले तरी याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे.