कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास काय होईल; पहा तज्ञांचं मत.

मुंबई दि.13 मे – सध्या राज्यात कोव्हॅक्सिन (Covaxin) लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून राज्याला फक्त 36 हजार कोव्हॅक्सिनचे डोस मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलाय, त्यांना दुसरा डोस मिळत नाहीय. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दुसरा डोस (second dose) मिळाला नाही, तर परत कोरोना होईल का? अशी भीती अनेकांच्या मनात आहे.
(What happens if the second dose of the covaxin vaccine is delayed; See expert opinion.)
सध्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात लसीकरण (Vaccination) मोहिम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. कोविशिल्ड (Covishield) व कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा केंद्र शासनाकडून व राज्य सरकारकडून सध्या होत आहे. सध्या मात्र केंद्राकडून कोव्हॅक्सिनचा पुरवठा होत नसल्याने 45 वर्षांपुढील दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे.
कोव्हॅक्सिनची (Covaxin) लस मिळत नसल्याने, अनेकांच्या मनात चिंता आणि संतापाची भावना आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 4 ते 6 आठड्यांनी दुसरा डोस (second dose) दिला जातो. पण कोव्हिशिल्ड (Covishield) किंवा कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला म्हणून पहिला डोस निष्प्रभावी ठरत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. महाराष्ट्रात पाच लाख नागरिक कोरोनाच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत.
“दुसऱ्या डोसला विलंब झाला, तर घाबरु नका” असे डॉ. एन.के.अरोरा यांनी सांगितले. “कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या अनेकांनी अजून दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. दोन डोसमधील अंतर आठ ते दहा आठवड्यांनी वाढलं, तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही. दुसरा डोस घेतल्यानंतरही कोरोना विरोधात लस प्रभावीच ठरेल” असे डॉ. एन.के.अरोरा यांनी सांगितले.
पहिला डोस घेतल्यानंतरच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. पण दुसऱ्या डोसला विलंब झाला म्हणून तो प्रभाव निघून जात नाही, असे आयआयएसईआरचे इम्युनोलॉजिस्ट डॉ. विनीता बाल म्हणाल्या. दुसरा डोस बुस्टर आहे. त्यामुळे पहिल्या डोसमुळे निर्माण झालेली क्षमता आणखी वाढते, असे विनीता म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्यावेळी लसीकरण (Vaccination) केंद्रावर जाणे टाळावे, तिथे संसर्गाची बाधा होण्याचा धोका अधिक असतो, असे डॉ. विनीता म्हणाल्या.