राजकीय वर्तुळात खळबळ उडालेल्या पत्रात दडलय काय?

मुंबई दि.21 जून – शिवसेनने पुन्हा भाजपशी युती करावी या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर भाजपकडून ही सच्च्या शिवसेना कार्यकर्त्यांची भावना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या जाचामुळेच सरनाईक यांनी ही भावना व्यक्त केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या लेटर बॉम्बनंतर दिल्लीत डेरेदाखल झाल्यामुळे राजकीय चर्चेस उधाण आले आहे. (What is hidden in the letter that has caused a stir in political circles?)
काय आहे पत्रात…
भाजपशी पुन्हा युती करावी- सरनाईकांचे पत्र
भाजपशी पुन्हा युती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे ठरविले असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते फोडत असल्याने आता भाजपशी जुळवून घ्यावे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी कोरोना काळात खंबीरपणे समर्थ नेतृत्व गेले दीड वर्षे दिले आहे. राजकारण बाजूला ठेवून मुख्यमंत्री काम करीत आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे (NCP) शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले, असे त्यांना वाटत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते व सनदी अधिकारी हे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी छुपी हातमिळवणी करीत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कामे होत असून शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत. त्याबद्दल शिवसेना (Shivsena) आमदारांमध्ये नाराजी असल्याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा आणि काही भाजप नेत्यांमुळे मला, अनिल परब, रवींद्र वायकर आदींना व त्यांच्या कुटुंबियांना गेले काही महिने कमालीचा त्रास होत असून बदनामीही होत आहे. या पत्रात त्यांनी भाजपचा (BJP) माजी खासदार तपास यंत्रणांचा दलाल म्हणून काम करीत असल्याचे नमूद केले आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन खासगीत चर्चाही केली आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. भाजप नेत्यांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते अधिक तुटण्यापेक्षा पंतप्रधान मोदींशी व भाजपशी (BJP) जुळवून घेतल्यास त्याचा माझ्यासह अन्य नेत्यांना आणि शिवसेनेलाही भविष्यात लाभच होईल, असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
अशा आहेत राजकीय प्रतिक्रिया …
सरनाईक यांचे पत्र हा शिवसेनेचा (Shivsena) अंतर्गत प्रश्न असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नसल्याचे मत व्यक्त केले. सरनाईक यांच्या पत्रामागील भावना काही वेगळी असावी. शिवसेनेतील नेते किंवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची उदाहरणे नाहीत, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी या पत्रावर काही प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे सांगितले. आपल्याला त्रास होत असल्याचे सरनाईक यांनी पत्रात नमूद केले असून तो कोणाचा आहे, हे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणातील घोटाळ्यात प्रताप सरनाईक हे आरोपी आहेत. तुरुंगात जाण्याच्या भीतीमुळेच ते भाजपशी युती करावी असे बोलू लागल्याची खोचक प्रतिक्रिया भाजपचे किरीट सौमेय्या यांनी व्यक्त केली.
सरनाईक यांच्या विरोधात गुन्हे दाखल
‘ टॉप्स कंपनी ‘ कडून करण्यात आलेल्या पैशांच्या फेराफेरीत अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशीही केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कंत्राटात झालेल्या गैरव्यवहारातही सरनाईक यांचे नाव आले होते.
अंमलबजावणी संचालनालयाने सरनाईक यांच्या कंपनीशी संबंधित टिटवाळ्यातील 112 भूखंडांवर जप्ती आणली. अलीकडेच त्यांच्या लोणावळ्यातील रिसोर्टवर धाडी टाकण्यात आल्या. सरनाईक यांच्या व्यवसायातील भागीदाराला अटक झाली होती. सुमारे पाच हजार कोटींपेक्षा अधिक घोटाळ्यात सरनाईक यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे किरीट सौमय्या यांनी केला होता. केंद्रीय यंत्रणांनी सरनाईक यांच्या भोवताली फास आवळल्यानेच त्यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याची भूमिका घेतली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.